>> डॉ. मुकुंद कुळे
आपल्याला अनेकदा संस्कृतीचा नको तितका अभिमान असतो. मात्र ज्या संस्कृतीचा आपण तोरा मिरवत असतो त्या संस्कृतीची आपल्याला असलेली माहिती बऱयाचदा ऐकीव स्वरूपाचीच असते. म्हणजे स्वत संस्कृतीविषयक वाचावं, त्यावर चिंतन-मनन करावं, त्याला आपली तयारी नसते. काळाच्या कसोटीवर संस्कृती-परंपरा योग्य की अयोग्य, ते ठरवण्यासाठी आधी आपण तत्संबंधीची माहिती वाचली पाहिजे. नीलकंठ फडके यांनी काही वर्षांपूर्वी सोमेश्वर राजाचा ‘मानसोल्लास’ (अभिलषितार्थचिंतामणी) हा ग्रंथ (रोहन प्रकाशन) संस्कृतमधून मराठीत अनुवादित केलेला. त्यातल्या अनेक गोष्टी आज कालबाह्य झालेल्या आहेत तरी अनेकदा भूतकाळातील ज्ञानाने दिपून जायला होतं. संपर्काची कुठलीही साधनं नसताना त्या वेळी माणसाने मिळविलेल्या ज्ञानाने अवाक व्हायला होतं. भले मग ते संदर्भ आजच्या काळाला लागू पडोत वा न पडोत. क्वचित कधी वर्तमानाचे दुवे असलेले तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती समजून घेण्यासाठी अशा ग्रंथांचा नक्कीच उपयोग होतो.
या ग्रंथातली माहिती म्हणजे आजच्या काळात जणू काही फँटसीच आहे. कारण सोमेश्वराने हा ग्रंथ रचला इ.स. 1129 साली. साहजिकच रीतिरिवाज, परंपरा, सामाजिक-राजकीय परिस्थिती… सारं काही आजच्या काळापेक्षा भिन्नच असणार. सामाजिक नीतिनियमांच्या दृष्टिकोनातून तर तत्कालीन अनेक गोष्टी आज त्याज्यच आहेत. तरीही या ग्रंथातून सोमेश्वराच्या ज्ञानाची, बुद्धीची जी झेप दिसते, ती स्तिमित करणारी आहे. वेशभूषेपासून आभूषणांपर्यंत, रत्नांपासून हत्ती-घोडय़ांच्या पालखीपर्यंत आणि अन्न रांधण्यापासून ते औषधी वनस्पतींपर्यंत… साऱयाविषयी सोमश्वराने जिव्हाळ्याने आणि अधिकारवाणीने लेखन केलं आहे. त्या अर्थाने सोमेश्वरविरचित ‘मानसोल्लास’ ग्रंथ म्हणजे एक माहितीकोशच आहे.
भारताच्या दक्षिण प्रांतात (महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटक) बदामी इथे सहाव्या शतकात उदयाला आलेल्या चालुक्य घराण्यातील हा राजा (सोमेश्वर तिसरा) बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला. सोमेश्वर तिसरा हा चालुक्य राजा सकलकलाविलासाचा भोक्ता होता. मात्र तो केवळ उपभोक्ताच नव्हता, तर त्याने आपल्या काळातल्या सर्व कलांचा-क्षेत्रांचा अभ्यास केलेला होता.
‘मानसोल्लास’ या ग्रंथांत एकूण पाच दीर्घ प्रकरणं आहेत- राज्य मिळवण्यासाठीचे उपाय, राज्य स्थिर करण्याचे उपाय, राजाचे उपभोग, मनोरंजनाच्या गोष्टी आणि सुख देणाऱया क्रीडा. या पाच प्रकरणांच्या अंतर्गत सोमेश्वराने आपल्या ज्ञानाची-बुद्धीची चमक दाखवली आहे. यातलं पहिलं प्रकरण म्हणजे एका अर्थाने त्याने परंपरांचं केलेलं पालन आहे. ते आजच्या दृष्टीने बहुतांशी कालबाह्य आहे. म्हणजे त्यात राज्य मिळवण्यासाठी शक्ती किंवा सामर्थ्यापेक्षा नैतिक आचरणावर भर देण्याची सूचना सोमेश्वराने केली आहे. नैतिक आचरण कुठल्याही काळात हवंच, पण नैतिक आचरणाअंतर्गत दान देणे, तप करणे, पतित व्यक्तींबरोबर संबंध टाळणे, सर्व देवतांची भक्ती करणे, गाय आणि ब्राह्मण यांची तृप्ती करणे यांसारख्या गोष्टी करणं आज कुणालाही मान्य होणार नाही, परंतु त्या काळात वाढलेल्या सोमेश्वराने त्यांचा उल्लेख करणं साहजिकच आहे. आपला परंपरांचा अभ्यास किती अचूक आहे, हेच जणू त्याला या पहिल्या प्रकरणातून सुचवायचं असावं.
‘राज्य स्थिर करण्याचे उपाय’ या दुसऱया प्रकरणात सोमेश्वराने आपलं राजकारणपटुत्व सिद्ध केलं आहे. हे प्रकरण म्हणजे राज्यव्यवहारकोशच आहे. राज्य करताना ते बळकट करण्यासाठी राजाने कोणतं भान बाळगलं पाहिजे, त्यासाठी मंत्र्यांची नेमणूक, त्यांचे अधिकार, राज्य वाढवण्यासाठी-राखण्यासाठी राजकोष (खजिना) कसा वाढवावा, जलदुर्ग-गिरिदुर्ग-वनदुर्ग-मरुदुर्ग-विटांचा-मातीचा असे विविध प्रकारचे किल्ले कसे उभारावेत, शत्रू चालून आला तर त्याच्या पराभवासाठी शस्त्रांप्रमाणेच दगड-वाळू, विषारी साप, वाघ-सिंहासारखे क्रूर पशू कसे राखावेत इत्यादी थक्क करणारी माहिती या प्रकरणात मिळते. त्याचप्रमाणे सैन्य-मित्र कसे वाढवावेत, आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत येणाऱया जमिनीची निगा कशी राखावी, त्या जमिनीवर राहणाऱया आपल्या रयतेची काळजी कशी घ्यावी, प्रत्येक गावावर अधिकारी कसा नेमावा, एक राष्ट्र म्हणून उभारणी कशी करावी, याची अचंबित करणारी माहिती या प्रकरणात मिळते. राज्य स्थिर करण्यासाठी वेळप्रसंगी साम-दाम-दंड-भेदाचा कसा वापर करावा, याचेही धडे सोमेश्वराने या प्रकरणात दिले आहेत.
‘मानसोल्लास’ ग्रंथातील तिसरं प्रकरण आहे- राजाचे उपभोग. हे उपभोग खरोखर फक्त राजालाच (आताच्या काळात उद्योगपती-राजकारण्यांना) शोभणारे आहेत. यात राजवाडय़ाचा उपभोग, स्नानभोग, विडय़ाचा भोग, अलंकारांचा उपभोग, पाण्याचा भोग, वाहनांचा उपभोग ते अगदी स्त्रियांचा उपभोग… इथवर राजाच्या विविध उपभोगांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राजाच्या उपभोगाच्या अंतर्गत सोमेश्वराने इतर गोष्टींची जी माहिती दिलीय, ती चकित करणारी आहे. उदाहरणार्थ, राजवाडय़ांच्या उपभोगामध्ये वाडा कुठे, कधी, कोणत्या जमिनीत ते कोणत्या झाडांपासून बांधावा आणि कोणत्या झाडांचा वापर करू नये याची माहिती देताना सोमेश्वर म्हणतो, ज्याच्यावर घरटे आहे असा, वड-औदुंबर-पिंपळ किंवा मधूक वृक्ष घरबांधणीसाठी वापरू नये. हत्तीच्या सुळ्यांनी दुखावलेला, वीज पडलेला तसेच नदीच्या संगमावर असलेला वृक्षही घरबांधणीसाठी वापरू नये. तसंच वस्त्रांच्या उपभोगाची माहिती देताना तो म्हणतो, ‘पोद्दाल नगरात तयार झालेली, चीरपल्ली येथे निर्मिलेली, नागपट्टण, चोल प्रदेश येथे तयार केलेली, अल्लिकाकुलात तयार झालेली, श्रीलेकंतील, अणिलावाड आणि मूलस्थानी तयार झालेली तोंडी देशातील आणि पंचपाटण येथील, चीन देशात तयार झालेली, त्याचप्रमाणे ओडिशा आणि बंगाल प्रांतातील वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रs खूप सुंदर असतात. यावरून सोमेश्वराला कुठलं वस्त्र कुठे चांगलं मिळतं याची कल्पना होती, असं दिसतं. अलंकारांच्या उपभोगाची माहिती देतानाही सोमेश्वर नाना प्रकारच्या रत्नांची, मोत्यांची माहिती देतो. त्याने वर्णन केलेला तांबूलभोग म्हणजे विडय़ांचा उपभोगही अप्रतिम असाच आहे. या भोगांतर्गत दात आणि गळ्याच्या आरोग्यासाठीच्या गोळ्यांची माहिती देताना तो सांगतो, कस्तुरी, कापूर, कंकोळ, जायफळ यांचे चूर्ण वस्त्रगाळ करून, त्यात खैराची पूड मिसळून त्याच्या गोळ्या बनवाव्यात.
या उपभोग प्रकरणातच सोमेश्वराने जो अन्नाचा उपभोग सांगितलेला आहे, तो भाग म्हणजे एक प्रकारे आपल्या प्राचीन खाद्य संस्कृतीचं घडवलेलं दर्शनच आहे. यात तांदळाचे विविध प्रकार सांगताना तो म्हणतो – लाल तांदूळ, मोठे तांदूळ, सुगंधी तांदूळ, बोडके तांदूळ, जाडे तांदूळ, बारीक तांदूळ, साठेसाळ इत्यादी प्रकारचे तांदूळ वापरावेत. तसंच पिवळे मूग, पावटा, हरभरा, तूरडाळ, उडीद डाळ, मसूर आणि राजमाष म्हणजे चवळी या सात कडधान्यांचा वापर आचाऱयांनी सांबारासाठी करावा. इतकंच नव्हे तर बोकडापासून डुकरापर्यंत वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसापासून तयार करण्याच्या पदार्थांचीही तो रसिकेतेने माहिती देतो. शाकाहारी-मांसाहारी, गोड-तिखट अशा सगळ्या प्रकारच्या तत्कालीन खाद्य संस्कृतीची झलक या अन्नोपभोगात सोमेश्वराने घडवली आहे.
राजा म्हटला की, त्याच्या मनोरंजनाच्या गोष्टीही आल्या. सोमेश्वराने ‘मनोरंजनाच्या गोष्टी’ या ‘मानसोल्लास’च्या शेवटच्या प्रकरणात करमणुकीच्या विविध खेळांची चर्चा केली आहे. त्यात प्राण्यांच्या खेळापासून मल्लयुद्धापर्यंत आणि शिकारीपासून संगीत-नृत्य-कथाकथनापर्यंतच्या मनोरंजनाच्या साधनांची चर्चा केली आहे. मात्र सोमेश्वराची ही चर्चा म्हणजे त्या-त्या गोष्टीची त्याने दिलेली इत्थंभूत माहिती आहे. कोंबडय़ांच्या झुंजीची माहिती देताना हे कोंबडे पाळायचे कसे, त्यांना कुठलं खाद्य द्यावं हे तो सांगतो. तसंच हत्ती आणि घोडय़ाच्या खेळांची माहिती सांगताना तो हत्ती-घोडय़ांच्या उत्तम-मध्यम-अधम जातींची ओळख करून देतोच, पण त्याचबरोबर त्यांना पकडावं कसं, शिकवावं कसं, याचीही सूक्ष्म माहिती सांगतो.
‘सुख देणाऱया क्रीडा’ या शेवटच्या प्रकरणातही सोमेश्वराने आपल्या ज्ञानाची कमाल दाखवली आहे. या प्रकरणात त्याने वनक्रीडा, झोपाळ्यावरच्या क्रीडा, फासे-बुद्धिबळाचा खेळ, शेतातील खेळ, वीरक्रीडा, प्रेमक्रीडा, प्रहेलिका म्हणजे कोडय़ांचा खेळ, मद्यपान क्रीडा अशा वेगवेगळ्या खेळांची माहितीपूर्ण झलक दाखवली आहे.
याच दृष्टीने सोमेश्वराचा हा ग्रंथ म्हणजे माहितीचा अद्भुत खजिना आहे. तो जितका उपसावा, तितके तुम्ही चकित होऊन जाता. या ग्रंथाची फक्त पाच प्रकरणांत विभागणी झालेली असली तरी प्रत्येक प्रकरणाच्या अंतर्गत केलेल्या उपप्रकरणांच्या माध्यमातून त्याने विविध विषयांची जी माहिती दिली आहे, ती अफाट आहे. त्याच्या प्रत्येक उपप्रकरणात एका-एका ग्रंथाचा ऐवज सामावलेला आहे. अभ्यासूंनी त्या प्रत्येक उपप्रकरणाकडे लक्ष दिलं तर मध्ययुगीन भारताचा (महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकाचा) एक वेगळाच सामाजिक-सांस्कृतिक इतिहास समोर येईल, एवढं नक्की!
mukundkule@gmail.com