प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
मुंबई शहरातील गिरगाव आणि मराठी माणूस हे एकमेकांना समानअर्थी शब्द शोभावे इतके जवळचे होते. काळ पुढे सरकला, मुंबई शहराने कात टाकली आणि मेट्रो शहर म्हणून बिरूद मिरवायला लागल्यानंतर गिरगाव आणि मराठी माणूस या नात्यामध्ये थोडी दरी निर्माण होत गेली. असं असतानाही दोघांना एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा मात्र आजही कायम आहे. कारण त्यांच्या प्रेमाची साक्ष असलेल्या काही वास्तू, जागा आजही त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत.
गिरगावमधील प्रत्येक कोपरा आणि वास्तूला इतिहासाचे संदर्भ आहेत, असंख्य आठवणींचे गाठोडं घेऊन आकाशाला भिडू पाहणारा हा परिसर आजही जुन्या-नव्या लोकांना खुणावत असतो. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच गिरगाव ही सामाजिक क्रांतीची भूमी राहिलेली आहे. इथूनच लोकमान्य टिळकांनी पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. जुने प्रघात मोडणं आणि नवीन संकल्पना रूजवण्याचं काम याच गिरगावमध्ये गेली अनेक दशके होत आलं आहे. अशीच एक चौकट मोडणारी गोष्ट १९४४ साली घडली. मराठमोठ्या गिरगावमध्ये ‘राजा रिफ्रेशमेन्टस’ हे पहिले दक्षिण भारतीय रेस्टॉरंट सुरू झाले. गिरगावात मराठी संस्कृतीची पताका फडकत असताना महाराष्ट्रीयन लोकांना ‘राजा’मुळे उडिपी संस्कृतीची ओळख झाली. गिरगावची जुनी ओळख असलेल्या कित्येक जागा आणि वास्तू जमीनदोस्त होत असताना गेली आठ दशके ‘राजा रिफ्रेशमेन्टस’ केवळ तग धरून नाही तर आजही गिरगावमधील प्रत्येक समुदायाचे आवडीचे ठिकाण आहे.
गिरगावमधील जनन्नाथ शंकरशेठ मार्गावरील दगडी बांधकाम असलेल्या गोरधनदास इमारतीमध्ये ‘राजा रिफ्रेशमेन्टस’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आजही त्याच जागी ‘राजा’ आपलं अस्तित्व टिकवून आहे. आजच्यासारखेच स्वातंत्र्यपूर्व काळातही पोटापाण्यासाठी मुंबईत लोकं येत. इतर समुदायांसोबतच कर्नाटकातील मेंगलोर येथील शेतकरी आणि इतर लोकंदेखील मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी यायचे. त्यामध्ये राजन शेट्टी हेदेखील होते. १९२४ साली जन्मलेले राजन वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच मुंबईत आले. सात-आठ वर्षे मुंबईत मेहनत करून हुशारी कमावलेल्या राजन यांनी तरुण वयातच स्वत:चे रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळी गिरगाव ही मराठी माणसांची ओळख होती. राजन यांनी धाडस करून दक्षिण भारतीय रेस्टॉरंट सुरू केले. घरात आणि बाहेरही तेच पदार्थ खाणाऱ्या मराठी समुदायासाठी हे नवीन होते.
मॅजेस्टिक सिनेमा, सेंट टेरेसा चर्च, ऑपेरा हाऊसच्या परिसरात असल्याने ग्राहकांची वानवा नव्हती. शिवाय, शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट असल्यामुळे सर्व समाजाच्या लोकांचा इथे राबता असे. दक्षिणेत मोठ्या भावाला अण्णा म्हणून संबोधतात. तसं राजन यांना लोकं प्रेमाने अण्णा किंवा राजा म्हणून हाक मारत. आपल्या नावावरूनच त्यांनी रेस्टॉरंटचे नामकरण ‘राजा रिफ्रेशमेन्टस’ केले होते. अण्णा शेट्टी वयाची पन्नाशी पार करण्याआधीच निवर्तले. मग पुढे १९८२ साली त्यांचा मुलगा रणजित शेट्टी याने रेस्टॉरंटचा कारभार हाती घेतला आणि आजवर ‘राजा’ची वाटचाल सुरू आहे. संजय शेट्टी हे त्यांचे मित्र सध्या यामध्ये त्यांना मदत करत आहेत.
इडली, वडा, डोसा या ‘राजा’च्या सिग्नेचर डिश आहेत. दक्षिण भारतीय पदार्थ बनवण्याच्या मूलभूत पद्धती येथे आजही तशाच आहेत. रणजित सांगतात, की पूर्वीची कुठलीही माणसं सहसा पाककृती लिहून ठेवत नसत. स्वत:ला येणाऱ्या गोष्टी ते मोकळेपणाने पुढच्या पिढीला किंवा हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला शिकवत. आमच्या पिढीकडेही त्याचप्रमाणे पदार्थांच्या पाककृती आल्या आहेत. पदार्थांच्या चवीत फरक पडलेला नाही, हे आम्हाला जुन्या लोकांकडून अधूनमधून ऐकायला मिळते, तेव्हा त्याचे समाधान वाटते. इडली आणि डोश्याचे अनेक प्रकार आता ‘राजा’मध्ये मिळू लागले आहेत. त्यासोबतच मेदू वडा, उत्तप्पा, उपवासाचे पदार्थ, विविध प्रकारच्या भजी, पावभाजी आणि पराठेदेखील मिळतात.
दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये लोकांना अनेकदा मोजकेच पदार्थ माहीत असतात. इथे पोडी इडली, थट्टे इडली, कांचिपुरम इडली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या मिळतात. त्याचबरोबर पालक मेदू वडा, अमेरिकन पिझ्झा उथप्पा, सांबार भात असे सामान्यपणे इतर रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये न आढळणारे पदार्थ इथे मिळतात. प्रत्येक नवीन पदार्थ बनवताना त्यातील माहीतगार लोकांना बोलावून त्याच्या काही चाचण्या घेऊन नंतरच तो पदार्थ मेन्यूमध्ये टाकला जातो. म्हणूनच की काय नवीन पदार्थसुद्धा लोकांनी आनंदाने स्वीकारल्याचे दिसते.
अनेकदा परिसर तोच असला तरी तिथे राहणारा समुदाय, तिथल्या लोकांच्या आवडीनिवडी, लोकांची पैसे खर्च करण्याची क्षमता बदलत जाते. अलीकडच्या काळात तर जाहिरातींचा इतका मारा आहे, की लोकांना बाहेर पडल्यानंतर काहीतरी नवीन खायचं असतं. अशावेळी व्यवसायाची गणिते बिघडू द्यायची नसतील तर बदल हा त्यावर एकमेव उपाय आहे, असं रणजित सांगतात. म्हणूनच दक्षिण भारतीय पदार्थांचे रेस्टॉरंट म्हणून सुरुवात झाली असली तरी दक्षिण भारतीय पदार्थांसोबतच काही वर्षांपूर्वी चायनीज आणि उत्तर भारतीय पदार्थदेखील येथे बनवण्यास सुरुवात झाली. त्यामध्येही आपले वेगळेपण कसे जपले जाईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
एकेकाळी गिरगावाततब्बल अकरा दक्षिण भारतीय रेस्टॉरंट होती. त्यांच्यामध्ये फक्त ‘राजा’च तग धरून आहे, कारण चव, सर्व्हिस आणि दरपत्रकाच्या बाबतीत दाखवलेली लवचिकता. दक्षिण भारतीय पदार्थांचे रेस्टॉरंट म्हणून ‘राजा’ची ओळख असली तरी चायनीज पदार्थांच्या बाबतीतही त्यांनी मास्टरी मिळवलेली दिसते. चायनीज सूप, स्टार्टर्स, मेन कोर्स यामध्ये सर्वच चायनीज पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, व्हेज चायनीज हा प्रकार एक्स्ल्युझिव्हली फार कमी ठिकाणी मिळत असल्यामुळे शाकाहारी लोकांना कोणतीही शंका मनात न बाळगता इथे बसून बिनधास्तपणे चायनीज पदार्थांवर ताव मारता येतो. ‘वन पर्सन मील’ म्हणजे एका व्यक्तीसाठी दोन पदार्थ असलेले भरपेट जेवणही येथे मिळते. त्यात आवडीप्रमाणे स्टार्टर, राईस किंवा नूडल्स, ग्रेव्ही असे तिन्ही प्रकार असतात. उत्तर भारतीय मेन्यूमध्येही स्टार्टर, भाज्या, रोटी, राईस यामधील वेगवेगळे प्रकार आहेत. याशिवाय सिझलर्स, शाकाहारी थाळी, भाज्यांचे कॉम्बो, पुलाव, बिर्याणीचे विविध प्रकार, खिचडी, गोड पदार्थ असा परिपूर्ण मेन्यू आहे.
कुठलाही मराठी महिना असो वा उपवास ‘राजा’ला कसलाच फरक पडत नाही, कारण सुरुवातीपासूनच शुद्ध शाकाहारी ही ओळख त्यांनी जपलेली आहे. ‘राजा’ने याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहिले नाही तर इथली लोकं, संस्कृतीसोबत आपले नाते जोडले. त्यामुळे गणेश विसर्जन, पाडवा, दसरा या सणांच्या दिवशी ‘राजा’मध्ये हमखास गर्दी होते. मराठी पाट्या हा राजकीय मुद्दा होण्याच्या खूप आधी ‘राजा’चा बोर्ड मराठी भाषेत होता आणि आजही आहे. रणजित शेट्टी यांचे मराठी भाषेवरील प्रेम आणि प्रभुत्व एखाद्या मराठी माणसालाही लाजवेल, असे आहे. कुठल्याही स्थानिक संस्कृतीला टक्कर देताना त्यांच्यावर कुरघोडी करण्यापेक्षा स्वत:चे वेगळेपण जपणे यात अधिक शहाणपण असते. त्यामुळे ‘राजा’ने मराठी पदार्थांमध्ये कधी हात घातला नाही. त्यात हातखंडा असलेल्या शेजारच्या पणशीकरांचा त्यांनी कायम आदर-सन्मान केला. हेच ‘राजा’च्या यशाचे आणि दीर्घ वाटचालीचे गुपित आहे.