>> धनंजय साठे
सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपल्याला असंख्य अनावश्यकतथ्यहीन माहिती सर्रास उपलब्ध होत असते. यात काही मीम्सचा समावेश झाला आहे. हे मीम्स बनवणारे नक्कीच संवेदनाहीन असावेत असंच वाटतं. कारण अतिशय गांभीर्याने एखाद्या विषयाकडे पाहण्याऐवजी हे मीम्सकर्ते विनोद आणि चेष्टा यातली बारीक रेष ओलांडून हे मीम्स बनवतात. कारण त्यांना जास्तेत जास्त व्हय़ूज हवे असतात. कोणत्याही भयानक घटना अथवा भीषण अपघातावर टिंगल टवाळीचे मीम्स… किती दुर्दैवी आहे ना हे?
काही लोकांना नको तिथे आणि नको तेव्हा विनोद करायची वाईट सवय असते. त्यात जर तयार मंच आणि प्रेक्षक वर्ग असेल तर मग विनोदनिर्मिती करणाऱयांना अजून चेव येतो. पण हे करताना संवेदनशीलता रजा घेऊन गावी गेल्यासारखी वाटते. आपल्या देशात सध्या असंख्य घडामोडी घडत आहेत. यांनी सामान्य माणूस हादरून गेलाय. पहलगामचे दहशतवादी हमले, राजा रघुवंशी हत्याकांड किंवा अहमदाबादमधली विमान दुर्घटना… अतिशय गांभीर्याने पाहण्यासारख्या या घटना आहेत.
परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला असंख्य अनावश्यक, तथ्यहीन माहिती सर्रास उपलब्ध होत असते. यात काही काळापासून मीम्सचा समावेश झाला आहे. बरं, हे मीम्स बनवणारे नक्कीच संवेदनाहीन असावेत असंच अनेकदा वाटतं. कारण अतिशय गांभीर्याने किंवा अभ्यासपूर्वक एखाद्या विषयाकडे पाहण्याऐवजी हे मीम्सकर्ते अनेकदा विनोद आणि चेष्टा यातली बारीक रेष ओलांडून हे मीम्स बनवतात. कारण त्यांना प्रेक्षकांना स्वतकडे खेचून घ्यायचं असतं. किती दुर्दैवी आहे ना? देव ना करो, पण जर या मीम्स बनवणाऱयांच्या घरच्यांवर तशीच परिस्थिती ओतर ही मंडळी तशा मीम्स बघतील का? नाही ना! या बालिश आणि मंदबुद्धीच्या लोकांना दुसऱयाच्या दुःखाची, मनःस्थितीची टिंगल उडवण्याचा हक्क कोणी दिलेला असतो?
दुर्दैवाने या मीम्स बनवणाऱया लोकांना कुठे थांबायचं याचं अजिबात भान नसतं. नुकतंच पाहिलेलं उदाहरण सांगतो. अहमदाबादमध्ये घडलेली भीषण विमान दुर्घटना, असंख्य स्वप्नांची राख झाली, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि त्यावर आलेली मीम. वडील विमानाने निघाले आहेत. मुलाला कॉल करतात आणि विचारतात की, ‘माझं फ्लाइट आता टेक आाफ होतंय. ते तुझ्या कॉलेजवरूनच जाणार आहे. ते तुला कोणत्या प्रोफेसरच्या डोक्यावर पडायला हवंय तर तसं सांग.’ मला सांगा या मीमकडे कोणत्या अँगलने विनोद म्हणून पाहायचं? तेसुद्धा नुकतंच घडून गेलेल्या एका भयानक दुर्घटनेनंतर? हा असंवेदनशीलतेचा कळस नाही तर काय म्हणावं? या मीम्स किंवा सो काल्ड विनोद बनवणाऱयांच्या घरावर असा दुःखाचा डोंगर कोसळला असता तर त्या नराधमाने असे विनोद केले असते का? टीव्हीचे रिपोटर्सही त्याच पठडीतले. आमचं कव्हरेज इतर माध्यमांपेक्षा कसं वेगवान आहे हे दाखवण्याच्या नादात पाचजणांच्या पामिलीचा म्हणजे डॉक्टर नवरा-बायको आणि त्यांच्या तीन चिमुकल्यांचा या दुर्घटनेत अंत झाला, त्यांनी कालेला शेवटचा सेल्फी प्रेक्षकांना वारंवार दाखवला गेला. त्या कुटुंबाला विमानतळावर सोडायला आलेल्या म्हाताऱया आजोबांना त्याबद्दल विचारलं गेलं. कमाल आहे! गेलेल्या व्यक्तीच्या शोकाकुल नातेवाईकांच्या घशात जवळजवळ माइक कोंबून त्यांना विचारतायत की आपको कैसे लग रहा है…? नेमकं काय उत्तर अपेक्षित असतं या मंदबुद्धी लोकांना? ज्या वैमानिकाचा बळी गेला त्याच्या 88 वर्षांच्या वडिलांना एका ज्ञानी रिपोर्टरने विचारलं की, तुमचं तुमच्या मुलाबरोबर शेवटचं बोलणं कधी आणि काय झालं होतं… ते बिचारे त्या मनःस्थितीत असतील का असल्या प्रश्नांना उत्तर द्यायला?
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मधुचंद्राला गेलेल्या जोडप्यातल्या बायकोनेच आपल्या प्रेमीच्या मदतीने नवऱयाचा खून केला वा करवला गेला. एका परिवाराने आपला मुलगा गमावला आणि यावर मीम काय बनते की, अख्खं गाव जल्लोष करतंय, कारण मधुचंद्राला गेलेलं जोडपं सुखरूप परतलंय. एका मीममध्ये नवरा मुलगा आपले आई-वडील राखण करण्यासाठी मधुचंद्र जोडप्याबरोबर प्रवास करतील असा आग्रह धरताना दिसतो. हा विनोदाचा विषय आहे का? परिस्थिती आणि झालेली घटना इतकी गंभीर आहे तरीही या मीमवाल्यांना आपली मीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असते म्हणून हा विनोद. उद्या यांच्या घरावर काळाने अशी झडप घातली तर आवडेल का या लोकांना? दुसऱयासाठी काहीच कशा संवेदना शिल्लक नाहीत या मीम्सकर्त्यांकडे?
गेल्या काही वर्षांमध्ये चित्र खूप बदललं आहे. निर्भया प्रकरण झालं तेव्हा टीव्ही वाहिन्या व एकूणच मीडिया आजच्या इतका पसरलेला नव्हता. म्हणून त्या विषयाचं गांभीर्य टिकून होतं. पण हल्ली सोशल मीडिया इतका मोठा झालाय की तो आवरण्याच्या पलीकडे गेलेला आहे. कोणावर कसलंच बंधन नाही. ऊठसुट कोणीही काही बोलतं, लिहितं, दाखवतं! ज्या विषयांवर अतिशय गंभीरपणे विचार झाला पाहिजे त्या विषयांवर मीम्स बनवले जातात आणि तेही अतिशय भावनाशून्य पद्धतीने. फक्त टिंगल, मस्करी, दुसऱयांवर विनोद करणं. सगळंच केविलवाणं. माच्युरिटीचा शंभर टक्के अभाव. कधी कधी वाटतं आयुष्य किती साधं सरळ होतं. समाजात माणसं एकमेकांचा विचार करायची. समवेदनेची भावना असायची. सध्या पैसा इतका मोठा झालाय की आजूबाजूला काय चाललंय याच्याशी घेणंदेणंच नसतं. कोणताच अंकुश नाही. कोणी थांबवायला नाही. अभिव्यक्ती स्वांतत्र्याखाली मीम्स आणि शब्दांचा बेलगाम वावर. आवर घाला रे…! नाहीतर तुमचाच विनोद तुम्हालाच कधी रडवून जाईल कळणारही नाही.
(लेखक िक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)