पुणे : वारीत नक्षलवादाचे आरोप असलेले लोक पाहायला मिळत आहेत. ते बुद्धिभेद करत असून सरकारने लवकर त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा वारकरी संप्रदायातील युवक त्यांना जाब विचारतील. त्यासाठी आम्ही युवक गट तयार केला आहे. तेव्हा सरकार जबाबदार राहील, असा इशारा ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे. समस्त वारकरी संस्था आणि संस्थानच्यावतीने शनिवारी २१ जून रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा बंडातात्या बोलत होते. कबीर कला मंच यांना सरकारने रोखले पाहिजे, अशी मागणी कराड यांनी केली. तर, वारीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करीत आहे? असा सवाल कराड यांनी उपस्थित केला आहे. (Pandharpur Wari 2025 government should stop kabir kala manch says bandatatya karadkar)
हेही वाचा : Aaditya Thackeray : मराठी द्वेषी भाजपाचे चाललंय काय? हिंदी भाषा मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा सवाल
बंडातात्या कराड म्हणाले, काही पुरोगामी संघटना पालखी सोहळ्यात येतात आणि अपप्रचार करतात. संताचे दाखले अर्धवट दिले जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठा आहे. त्यांची संघशक्ती मोठी आहे. वाघाचे कातडी पाखरून वाघ होता येत नाही. मात्र, असेच काहीजण काम करत आहेत. काहीजण वारकरी गर्दीचा फायदा घेऊन आपले खोट नाणे चालवत आहेत. वारकरी मुळावर घाला घालीत आहेत. आम्ही कुणाचा द्वेष करत नाहीत. पण, मुळावर घाव घालत असाल तर हे लोकांना सांगितले पाहिजे, असे बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.
मोशीत कत्तलखाना होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे. पण, त्याची लेखी सूचना निघाली पाहिजे. आमची सरकारला मागणी आहे की, आम्ही पंढरपूरला जाईपर्यंत आमच्या मागण्या मान्य करून लेखी सूचना द्याव्यात. अन्यथा वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र झाल्यास आंदोलन होईल, असा इशारा बंडातात्या कराड यांनी दिला आहे.