शेजारी देशांसोबतच्या संबंधांप्रकरणी जयशंकर यांची टिप्पणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने शेजारी देशांसोबतच्या स्वत:च्या संबंधांप्रकरणी सदैव सुगमतेची अपेक्षा करू नये. भारतासोबत काम केल्याने लाभ होईल आणि भारतासोबत काम न करण्याची किंमत मोजावी लागेल हे अखेर आमच्या प्रत्येक शेजाऱ्याने समजून घ्यायला हवे असे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत. त्यांनी हे वक्तव्य बांगलादेशला उद्देशून केल्याचे मानले जात आहे.
चीनसमोर भारताला उभे ठाकावे लागणार आहे. खासकरून 2020 मध्ये गलवान येथील संघर्षानंतर दोन्ही देशांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले आहेत. एकेकाळी भारत स्वत:च्या सीमा संरचनेकडे दुर्लक्ष करत चीन धोरण आखत राहिला ही मोठी चूक होती. परंतु आता भारताने मजबूत सीमा सुविधा उभ्या केल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सार्वभौमत्वाचे रक्षण शक्य ठरले असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. अमेरिका ही एक ‘अनप्रेडिक्टेबल’ म्हणजेच अनिश्चित शक्ती आहे. याचमुळे भारताने अमेरिकेसोबत स्वत:चे संबंध अनेक स्तरांवर मजबूत केल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
सरकार कुठलेही, संबंध तेच
भारताने शेजारी देश, आखाती देश, आसियान आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासोबत संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. श्रीलंका आणि मालदीव येथे सत्तांतर होऊनही भारतासोबत या देशांचे संबंध सकारात्मक राहिले आहेत. नेपाळच्या अंतर्गत राजकारणात अनेकदा भारताचा मुद्दा समोर येतो. परंतु सामुहिक हित वैयक्तिक मतभेदांपेक्षा वरचढ ठरेल अशी संस्कृती भारताने विकसित करणे आवश्यक आहे. जर संकट आली तर हात वर केले जाऊ नयेत, ही खराब रणनीति ठरेल असे वक्तव्य जयशंकर यांनी केले आहे.
भारत आता गप्प बसणार नाही
26/11 मुंबईवरील हल्ला एक टर्निंग पॉइंट होता, दशकांपर्यंत भारताने पाकिस्तान विरोधात एकसारखे धोरण अवलंबिले, परंतु मोदी सरकार आल्यावर या धोरणात बदल झाला. उरी सर्जिकल स्ट्राइक (2016), बालाकोट एअर स्ट्राइक (2019) आणि अलिकडे झालेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयशंकर यांनी हे ‘न्यू नॉर्मल’ असून आता भारत केवळ प्रत्युत्तर देत नाही, तर पुढाकारही घेतो. आता कुणी काहीही केले तरीही भारत गप्प बसेल असा विचार करू शकत नाही. दहशतवादावरील भारताची कारवाई आणि जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविणे एका व्यापक रणनीतिचा हिस्सा असून या वेगवेगळ्या घटना नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
भारताचे विदेश धोरण अन् मोदींची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रभावी नेते आहेत. देशाची धारणा आता बदलली असुन मोदी देशाचा आत्मविश्वास दर्शवितात. भारताने जगाच्या बदलल्या स्थितीला समजून घेत बहुध्रूवीय जगात स्वत:ला चांगल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मागील 11 वर्षांमध्ये भारताच्या विदेश धोरणाने या बहुध्रूवीय विश्वाला विचारात घेतच दिशा निश्चित केली आणि हे यापुढेही जारी राहणार आहे. सध्याच्या जगात अनेक ध्रूवं असून जे प्रतिस्पर्धा देखील करतात आणि सहकार्य देखील. आपल्यापासून कमीतकमी समस्या व्हाव्यात आणि सर्वाधिक लाभ मिळावेत हेच भारताचे धोरण असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.