सद्गुरू : तुम्हाला ज्या लोकांची चीड येते, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करायला हवे, याबद्दल बरीच चर्चा होते. जे लोक तुम्हाला चीड आणतात, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही, तुम्ही प्रेम करण्याचे फक्त नाटक करू शकता.
तुम्ही प्रेम करण्याचे नाटक करण्याऐवजी, फक्त एवढेच पाहा, की त्यांच्यामुळे तुम्हाला चीड येत आहे आणि याकडे लक्ष द्या, की तुम्हाला त्यांच्यामुळे चीड का येत आहे? तुम्हाला त्यांच्यामुळे चीड येत आहे, कारण ते लोक तुम्ही जशी अपेक्षा करता त्या प्रमाणे नाहीत; ते लोक तुम्हाला हवे तसे नाहीत.
तर, तुम्ही स्वतःची फसवणूक करू नका. फक्त एवढेच पाहा, की ही चीड येत आहे, याचे कारण असे आहे, की तुम्ही आधीच हे ठरवले आहे, की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. जर ते लोक वेगळ्या प्रकारे वागले, तर आधी तुम्हाला चीड येईल, नंतर तुम्हाला राग येईल, त्या नंतर तुम्ही त्यांचा द्वेष कराल. या सगळ्या स्वाभाविक प्रक्रिया आहेत.
हे फक्त यामुळे घडते, की तुम्ही जगातील प्रत्येक व्यक्तीकडून अशी अपेक्षा करता, की ते लोक तुमच्यासारखेच असले पाहिजेत. जर जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखीच असेल, तर तुम्ही इथे राहू शकाल का? तुमच्या घरात जर तुमच्यासारखी आणखी एक व्यक्ती असेल, तर त्या घरात राहणे तुम्हाला शक्य होणार नाही.
हे खूप चांगले आहे, की जगातील प्रत्येक जण हा त्याच्या स्वतःसारखाच आहे. या संपूर्ण लोकसमूहातून, जर तुम्ही कोणत्याही मानवाकडे पहिले, तर ती व्यक्ती पूर्णपणे अद्वितीय आहे. या पृथ्वीवर दुसरीकडे कुठेही त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नाही. अशा प्रकारची व्यक्ती आधी कधी होऊन गेली नाही आणि अशा प्रकारची व्यक्ती पुढे भविष्यात कधीही होणार नाही. ती एक पूर्णपणे अद्वितीय व्यक्ती आहे.
जर तुम्ही हे ओळखले, की या व्यक्तीसारखी फक्त हीच एक व्यक्ती आहे आणि असा मौल्यवान नमुना फक्त एकमेव आहे, तर मग ती व्यक्ती तुम्हाला कशी काय चीड आणू शकते? ती एक पूर्णपणे अद्वितीय व्यक्ती आहे. या व्यक्तीसारखा दुसरा कोणताही मानव नाही आणि तुमच्यासाठी हा खूप मोठा चमत्कार आहे, की तुम्हाला असा मानव माहीत आहे, की जो पूर्णपणे अद्वितीय आहे. जर तुम्ही हे पाहिले, तर चीड येण्याचा प्रश्नच कुठे येतो?
जर तुम्ही स्वतःचे डोळे उघडले आणि जीवनाकडे पाहिले, तर एखादी व्यक्ती तुम्हाला चीड कशी आणू शकेल? जर तुम्ही जीवनाकडे पाहण्याच्या बाबतीत आंधळे बनला असाल, तरच तुम्हाला चीड येईल. तुम्ही ओसंडून वाहणाऱ्या प्रेमाचा स्रोत बनण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, निर्मितीतील प्रत्येक गोष्टीची अद्वितीयता पाहणे.