लीड्स कसोटी सामन्याचा पाचवा दिवसाची पहिली दोन सत्र इंग्लंडच्या नावावर राहिली आहे. भारतीय गोलंदाज विकेटसाठी झुंज देताना दिसली. भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी पुरेपूर घेतला. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने एकही विकेट गमावला नाही. त्यानंतर आणखी काही धावांची भर घातली आणि पावसाचा व्यत्यय येईपर्यंत 190 धावा केल्या. पण लंचपूर्वीच्या शेवटच्या षटकात मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा फलंदाज जॅक क्राउली यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळाला. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला एकही विकेट मिळाला नाही. भारतीय गोलंदाज विकेटसाठी धडपड करताना दिसले मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलंच झुंजवलं. सर्व काही शांतपणे सुरु असताना लंचपूर्वी शेवटच्या षटकात एक गोंधळ उडाला.
मोहम्मद सिराज लंचच्या अगदी आधी शेवटचं षटक टाकत होता. भारतीय संघाच्या रणनितीनुसार लंचपूर्वी आणखी एक षटक टाकण्याचं होतं. जेणेकरून इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला जाईल. सिराजने हे षटक झटपट टाकण्याचा प्रयत्न केला. पण शेवटचा चेंडू टाकताना धाव घेतली आणि टाकला तेव्हा जॅक क्राउली जाणीवपूर्वी बाजूला झाला. त्यामुळे एक चेंडू अधिकचा टाकावा लागला. त्यामुळे दुसरं षटक टाकण्यास विलंब झाला. तसेच पंचांनी सिराजने चेंडू टाकल्यानंतर लगेचच लंच ब्रेक जाहीर केला. या प्रकारामुळे भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली.
मोहम्मद सिराज कायम मैदानात आक्रमकपणा दाखवतो. तसेच विकेटसाठी धडपड करत असतो पण त्याला काही यश मिळताना दिसत नाही. असं असताना या कृत्यामुळे सिराज खूपच नाराज झाला. भारतीय कर्णधार शुबमन गिल आणि इतर खेळाडूंनी क्राउलीच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. यामुळे काही काळ मैदानावर तणावाचं वातावरण होतं. पण त्याने केलेला प्रकार नियमबाह्य नसल्याने पंचही काही बोलू शकले नाहीत. सोशल मीडियावर चाहते घटनेवर टीका करत आहेत आणि इंग्लंडच्या फलंदाजांवर अप्रामाणिकपणाचा आरोप करत आहेत.