-rat२३p४.jpg-
P२५N७२४५९
रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाउंडेशनच्या ग्लोबल मीटमध्ये बोलताना उद्योजक दीपक गद्रे. सोबत डॉ. श्रीधर ठाकूर, श्रीपाद खेर, संवादक प्रसाद देवस्थळी.
-------
स्वतःच्या हिंमत, कष्टावर यश मिळवा
केबीबीएफ ग्लोबल मीट; उद्योजक परिसंवादातील सूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : यशस्वी उद्योजकालाही अपयशाची चव घ्यावीच लागते; पण त्यातून सुधारणा करत यशाकडे झेप घेता येते. स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवा, मोठी स्वप्नं बघा आणि त्यावर मेहनत घ्या, असा सल्ला अंबर हॉलमध्ये आयोजित कऱ्हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाउंडेशनच्या (केबीबीएफ) ग्लोबल मीटमधील परिसंवादामध्ये उद्योजकांनी दिला. यामध्ये गद्रे मरिन्सचे संचालक दीपक गद्रे, इन्फिगो आयकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर आणि अमोघ केमिकल्सचे श्रीपाद खेर यांनी संवाद साधला.
कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये यश मिळवणाऱ्या प्रसाद देवस्थळी यांनी त्यांना सहज प्रश्न विचारत बोलते केले. उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. दीपक गद्रे म्हणाले, कोणत्याही कर्मचाऱ्याला एक चूक करण्याची मुभा आहे; पण तीच तीच चूक सारखी करू नये. प्रत्येक माणसाने आपल्या व्यवसायांमध्ये आज जे काय आहे त्यात उद्या काहीतरी नवीन बदल होण्याची शक्यता आहे. ते झालं तर आपण काय करायचं, याचा विचार नेहमी केला पाहिजे.
डॉ. ठाकूर म्हणाले की, उद्योग करताना संकटे आली तर त्यातून सुधारण्यासाठी आपल्याकडे कौशल्ये असली पाहिजेत. त्यातून परिपक्वता विकसित होत असते. एखादे यश मिळाले की, आपले कौतुक होते; पण अपयश आल्यावरही आपण जबाबदारी घ्यावी लागते. मी २७५ हॉस्पिटल देशभरात उभी केली; पण त्यातली ५-६ बंद करावी लागली. त्यामुळे प्रत्येक वेळेसच यश मिळते, असं नाही. सतत शिकत राहिले पाहिजे.
अमोघ केमिकल्सचे श्रीपाद खेर म्हणाले, मी केमिस्ट म्हणून एका कंपनीत ५ वर्षे काम केले; पण बढती न मिळाल्याने कंपनी सोडली त्या वेळी व्यवस्थापकाने तू काम करून घेऊ शकत नसल्याने बढती मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या कंपनीत गेलास तरी केमिस्टच राहशील, असे सांगितले. त्या वेळी मला प्रथम माझ्यातली कमतरता समजली. दुसऱ्या कंपनीत ही चूक सुधारली. रासायनिक कंपनी, त्यातून उत्सर्जन होणारे सांडपाणी, धूर, वायू, नागरी वस्ती किती दूर आहे, याचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे गुजरातमध्ये कंपन्या उभ्या केल्या.
---
भविष्यात यात संधी
भविष्यात खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगात मोठी संधी असल्याने त्यावर भर द्यावा, असे दीपक गद्रे म्हणाले तर डॉ. ठाकूर यांनी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसमवेत नाभिक, हॉटेल व्यवसाय, प्रसूतीगृह यामध्येही उद्योगसंधी आहेत. तिसरी सर्वांत चालणारी गोष्ट पर्यटन. लोक कोकणात फिरायला मोठ्या प्रमाणात येतील; परंतु स्थानिक लोकांची मनोभूमिका सकारात्मक नसल्याचे सांगितले. विविध प्रकारच्या रंग, रसायन उद्योगांमध्ये भविष्यात मोठी संधी असल्याचे श्रीपाद खेर यांनी सांगितले.