Maratha Reservation : आरक्षणाशिवाय मुंबईहून परतणार नाही : मनोज जरांगे
esakal June 30, 2025 01:45 PM

वडीगोद्री : ‘आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत येणार नाही’, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज व्यक्त केला. २९ ऑगस्टला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे त्यांनी आज समाजबांधवांच्या राज्यस्तरीय बैठकीत ‘आता माघार नाही’चा पुनरुच्चार केला.

जरांगे म्हणाले, ‘‘राज्यात समाज एक झाला आहे. कोणीही मराठा समाजात फूट पाडू शकणार नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी आता रणभूमीत उतरायचे आहे. त्यासाठी २९ ऑगस्टला मुंबईत मोर्चाची घोषणा यापूर्वीच केली आहे. या मोर्चाने मुंबई ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही. दोन वर्षांपासून संर्घष सुरू आहे.

सरकार आरक्षण देत नाही, पण ते घेतल्याशिवाय परत येणार नाही. पुणे, मुंबई, अहिल्यादेवीनगर आदी ठिकाणच्या नागरिकांनी मोर्चाची मोठी जबाबदारी घ्यावी. मुंबईला गेल्यावर गुलाल घेऊनच परतू. २७ ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून निघायचे आहे. पहिला मुक्काम शिवनेरी किल्यावर होईल.’’

जरांगे म्हणाले
  • मुख्यमंत्र्यांशी वैर नाही

  • सर्व पक्षांच्या मराठा नेत्यांनी सरकारला जाब विचारावा

  • संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय व कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी होईपर्यंत मागे हटणार नाही

  • शिंदे समितीला वर्षाची मुदतवाढ द्या

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.