मुंबई : ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून शेतकऱ्यांविषयीची सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत आणि विविध भ्रष्टाचारांमध्ये मंत्र्यांचा सहभाग असल्याचा निषेध करत विरोधकांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अंबादास दानवे यांनी ही भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात गैरव्यवहार झाल्याची तसेच, अत्याचाराच्या घटना आणि राज्यातील जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची टीका केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यावेळी उपस्थित उपस्थित होते.
‘‘सत्ताधारी पक्षाचे अनेक लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असून त्यांना पोलिसांचे त्यांना संरक्षण आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देत आहेत. भाजप आणि गद्दारांनी आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असे विचारण्याची परिस्थिती या सरकारने करून ठेवली आहे,’’ अशी टीका दानवे यांनी केली. तर, महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापान कार्यक्रमाला जाणे म्हणजे म्हणजे पाप असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचे नाव दिले गेले, त्यावरच खड्डे पडले आहेत, नदी वाहत आहे, हे नेमके काय चालले आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
सत्ताधाऱ्यांचे चहापानमहाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता. ३०) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारमधील सर्व मंत्री हजर होते.
सरकार भ्रष्टाचारात अखंड बुडालेले असून पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. निधी पाहिजे असेल, तर टक्केवारी मोजावी लागते. कापसाला कीड लागलेली असताना मदत दिली जात नाही. सरकारने सत्तेवर आल्यावर जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.
- विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते, काँग्रेस
महायुती सरकार राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे. या सरकारचा सुरू असलेला राजकीय जुगार हा केविलवाणा व किळसवाणा प्रकार आहे.
- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)
शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतील शेतकरी विरोध करत आहेत. गरज नसलेला हा महामार्ग रद्द करावा.
- सतेज पाटील, काँग्रेसचे आमदार