University Development : विश्वविद्यालयाला उत्कृष्ट बनवण्यासाठी समर्पण द्या : सरन्यायाधीश भूषण गवई
esakal June 30, 2025 01:45 PM

नागपूर : विश्वविद्यालयात पायाभूत सुविधा, चांगली इमारत आणि उत्तम वातावरणासाठी सरकार निधी देते. परंतु शैक्षणिक उत्कृष्टतेचा प्रश्न येतो तेव्हा तो पूर्णपणे कुलगुरू आणि प्राध्यापकांच्या हातात असतो. त्यामुळे विद्यापीठाला उत्कृष्ट बनवण्यासाठी कुलगुरू, प्राध्यापकांचे समर्पण आणि योगदान आवश्यक आहे, असे मत सरन्यायाधीश आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे कुलपती भूषण गवई यांनी व्यक्त केले.

वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (एमएनएलयू) प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आणि ई-ग्रंथालयाचे भूमिपूजन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश प्रसन्ना वराळे, न्यायाधीश अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे, राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार आदी उपस्थित होते.

सरन्यायाधीश गवई म्हणाले, ‘‘महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठे आहेत. माझ्या कार्यकाळात या विश्वविद्यालयाची सुरुवात झाली आणि आज सरन्यायाधीश म्हणून माझ्याच हस्ते पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले, याचा मला अभिमान आहे.’’

‘मुंबईतही विधी विद्यापीठाचे बांधकाम’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सरकारने मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठे स्थापन होत आहेत. केवळ नागपूरचेच काम पूर्ण झाले नाही, तर छत्रपती संभाजीनगरच्या विश्वविद्यालयाला निधी देऊन काम केले गेले आणि मुंबईत विधी विद्यापीठाला जागा देण्यात आली. आता आराखडा तयार झाला असून, लवकरच मुंबईत या विद्यापीठाचे बांधकाम सुरू होईल.’’'

विश्वविद्यालयात ज्ञान अद्ययावत : गडकरी

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की कायदा क्षेत्रात गुणात्मक पारदर्शकता येण्यासाठी, अभ्यास, चिंतन आणि नवीन दृष्टिकोनासाठी भविष्यातील पिढी या क्षेत्रात कार्यरत असेल, त्यांना प्रेरणा देणारी राष्ट्रीय विधी विद्यापीठाची वास्तू तयार झाली आहे. ज्ञानाच्या अद्ययावतीकरणाचा या विश्वविद्यालयात उत्तम वापर झाला आहे. भविष्यासाठी ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.