वाहन चालकांना दिलासा, या राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये 50 टक्के होणार कपात
Tv9 Marathi July 06, 2025 06:45 AM

Toll Charges Cut : राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल टॅक्सच्या नियमात बदल केला आहे. यामुळे काही महामार्गांवरील टोल ५० टक्के कमी होणार आहे. ज्या महामार्गावर पूल, बोगदे, फ्लायओव्हर आणि एलिवेटेड रोड आहे त्या ठिकाणी टोल कमी होणार आहे.

सरकारने केला नियमात बदल

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एनएच शुल्क नियम, २००८ मध्ये संशोधन केले आहे. त्यासंदर्भात २ जुलै रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. या नियमात बदल केल्यानंतर टोल आकारण्यासाठी करण्यात येणारी मोजणीची पद्धत पूर्णपणे बदलली जाणार आहे. यामुळे प्रवाशांवरील टोल कमी होणार आहे.

मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, महामार्गवरील शुल्क दोन प्रकारे मोजले जाईल. या दोघांमधून ज्या मोजणीतून कमी टोल लागणार आहे, तो आकारण्यात आले.

  • संरचनेच्या लांबीच्या दहा पट जोडून.
  • विभागाच्या एकूण लांबीच्या पाच पट.
  • या पद्धतीने टोल होणार कमी

    मंत्रालयाने दिलेल्या उदाहरणानुसार दोन पद्धतीने मार्गावरील टोल काढणार आहे.

  • जर राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी ४० किमी असेल.महामार्गावर बोगदा किंवा उड्डाणपूल असतील तर १० x ४० = ४०० किमी (संरचनेच्या लांबीच्या १० पट)
  • दुसरी पद्धतीत ५ x ४० = २०० किमी (विभागाच्या एकूण लांबीच्या ५ पट)
    टोल शुल्क कमी अंतरावर (२०० किमी) आधारित आकारले जाईल. यामुळे टोल दरांमध्ये सुमारे ५० टक्के थेट सूट मिळणार आहे.
  • आतापर्यंत काय होता नियम?

    आतापर्यंतच्या नियमांनुसार, बांधकाम असलेल्या मार्गांवर प्रवाशांकडून प्रति किलोमीटर १० पट टोल आकारला जात होता. यामागील उद्देश या महागड्या बांधकामांचा खर्च वसूल करणे होता. परंतु यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार वाढत होता. या बदलासंदर्भात बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, आधी रस्त्यावरील बांधकामाचा जास्त खर्च लक्षात घेऊन १० पट टोल घेतला जात होता. परंतु आता त्यात ५०% पर्यंत सवलत देण्यात आली आहे.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.