Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या अशी मागणी करणारे मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी मुंबईत येणार आहे. या आंदोलनादरम्यान लाखो मराठा बांधव मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. याआधी जरांगे यांच्याकडून दौरे सुरू असून ते मराठा समाजाला जास्तीत जास्त संख्येने मुंबईत जमा होण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच मराठ्यांच्या पोरांना डिवचले तर मी सोडणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
मुंबईत आपल्याला शांततेत जायचं आहेआमच्या उभ्या पिढ्यांचे वाटोळे झाले. आजकाल उन्हातान्हात कोणीही बसत नाही. विचार करून पुढच्या लढाया जिंकायच्या आहेत. चलो मुंबई. आता 29 ऑगस्टला फाईटच आहे. मला मुंबईत मारतील, असे सांगत होते. तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात माझ्या माय-बहिणी टाकल्या आहेत. पण यावेळी तुम्ही फक्त पोरांना डिवचून दाखवा. मराठ्यांची औलाद काय आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवतो. आपल्याला मुंबईत शांततेत जायचं आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थित मराठा बांधवांना केले.
मनोज जरांगेंचा पोलिसांना इशारापोलिसांनी आम्हाला डीजे वाजवू दिला नाही. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. सत्ता येत-जात असते. मी फार खुनशी आहे. एखादा माझ्या डोक्यात बसला की मी त्याचा बाजारच उठवून टाकत असतो. आता बीड जिल्ह्यात दुसऱ्या कोणाचा डीजे वाजू द्या मग सांगतो, असा इशाराही मनोज जरांगे यांनी पोलिसांना दिला.
बीडमध्ये दंगल घडवण्याचा विचार होता का?माझ्या जातीला कोणी विनाकारण टोकलं तर मी सोडत नाही. फडणवीस डीवायएसपी यांना चिल्लर चाळे करायला लावत आहेत. माझी जात शांततेत मागणी करत आहे. तुम्ही माझ्या जातीला डिवचले जात आहे. डीजा हा मराठ्यांना छेडण्याचा विषय आहे का? फडणवीस यांचे ऐकून बीडमध्ये दंगल घडवण्याचा विचार होता का? असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.
माझ्या लेकराबाळांचा प्रश्न आहे, म्हणूनच मी…आरक्षण न दिल्यास काय ते आता मुंबईत गेल्यावर सांगतो. आता त्यांची पळापळी सुरू झाली आहे. मराठ्यांची दखल घेतली गेली नाही. मराठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही. माझ्या लेकराबाळांचा प्रश्न आहे. म्हणूनच मला मुंबईला यायचं आहे. तुम्ही आमच्या मागण्या करा. आम्ही मुंबईला येणार नाहीत. आम्ही इथूनच मंत्रालयावर गुलाल फेकू, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मराठा समाजावर प्रश्न उपस्थित केले जातील असे कोणतेही कृत्य करू नये. दगडफेक, जाळपोळ करू नये असेही आवाहन जरांगे यांनी आपल्या मराठा बांधवांना केले.