नवी मुंबईतील शौचालयांची दुरवस्था
नेरूळ, ता. ८ (बातमीदार) ः स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पालिकेकडून विविध शौचालयांची बांधणी करण्यात आली. यामुळे स्वच्छता अभियानाअंतर्गत पालिकेला देश स्तरावर विविध पुरस्कार मिळाले. ही वस्तुस्थिती असतानादेखील शहरातील झोपडपट्टी परिसर व गावठाण विभागात अनेक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. या शौचालयांची ही अवस्था सुधारून येथे सायबर सिटीला साजेशी शौचालये उभारावी, अशी मागणी नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांनी निवेदन देऊन केली आहे. त्यांनी शिष्टमंडळासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली आहे.
नवी मुंबईतील आठही विभाग कार्यक्षेत्रांतील विशेषत: गावठाण व झोपडपट्टी परिसरातील अनेक शौचालयांची गंभीर दुरवस्था झाली आहे. अनेक शौचालयांच्या आसपास घाण पसरली असून, दरवाजे तुटले आहेत. या शौचालयांत पाण्याची कमतरता आहे. यामुळे नागरिक नैसर्गिक विधीसाठी येथे जाणे टाळत असल्याचे सांगत या कृतीमुळे नवी मुंबई स्वच्छ भारत अभियानातील हागणदारीमुक्ती अभियानाला गालबोट लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शौचालयांची दुरुस्ती होत नसल्याने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे निवेदन देताना त्यांच्यासोबत महिला जिल्हाध्यक्ष रेखा इंगळे, जिल्हा सचिव विष्णू वासमणी, सल्लागार दिलीप बळसाने, कोपरकर यांनी विभागप्रमुख इंगळे, ॲड. पल्लवी राजपक्ष, बबन गवई आदी उपस्थित होते. तर शौचालयात समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, असे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांनी म्हटले आहे.