वाकड, ता. ९ : ‘‘शिक्षणामुळे अनेक देशात क्रांती झाली. समाजात परिवर्तन घडवण्याची क्षमता शिक्षणात असते. त्यामुळे शिक्षकांचे कार्य देशासाठी महत्त्वाचे ठरते,’’ असे प्रतिपादन बालभारती पाठ्यपुस्तक संपादन मंडळाचे माजी सदस्य व शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक श्रीकांत चौगुले यांनी केले.
थेरगाव येथे इनरव्हील क्लब ऑफ पुणे क्वीन या संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी क्लबच्या अध्यक्ष मीना खनाळे, विभागीय प्रमुख अंजली दाशरथी, अल्पना ओझा, शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते. महापालिकेच्या ‘ग’ प्रभागातील हणमंत माने, कविता इंदलकर, सुवर्णा बोराटे, कीर्ती भाडळे, धनश्री चौगुले, अनिल सुकाळे, सुनीता तिकोणे, नामदेव चव्हाण, शैला बनकर, अनिता गेंगजे, हेमलता सोळवंडे, उर्मिला राजे, मयुरी लाकारे, शामल दौंडकर, सुनंदा सपकाळ, शुभांगी गायकवाड, विद्या निंबाळकर, दीपाली नवले या १६ शाळांतील गुणवंत शिक्षकांचा सन्मान झाला.
अंजली दाशरथी यांनी अध्यक्षीय मनोगतात शिक्षकांचे कौतुक करतानाच, संस्कारक्षम व नावीन्यपूर्ण शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिवाजी दौंडकर यांनी प्रास्ताविक, राधिका भोईटे यांनी सूत्रसंचालन केले.