उच्च न्यायालयात खड्ड्यांविरोधात याचिका
आज सुनावणी, मिरा-भाईंदरमधील मेट्रोच्या कामांची तक्रार
भाईंदर, ता.१५(बातमीदार): मिरा-भाईंदर शहरातील मेट्रोच्या कामांतर्गत रस्त्यांवरील खड्डयांविरोधात गो ग्रीन फाउंडेशन ट्रस्टचे विरभद्र कोनापुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (ता.१६) सुनावणी होणार आहे.
दहिसर चेकनाका ते भाईंदर या मेट्रो मार्गिका क्रमांक ९ च्या कामादरम्यान खोदकामामुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. मेट्रो-कामादरम्यान रस्ता खराब झाल्याने मुख्य रस्त्यावर एमएमआरडीएने तीन वर्षांपूर्वी २२ कोटी १२ लाख ४९ रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराच्या माध्यमातून मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने डांबरीकरण करून घेतले. परंतु, या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.
--------------------------------
कारवाईची मागणी
कंत्राटदाराचा दोषदायत्व कालावधी पाच वर्षांचा असताना रस्त्याला दरवर्षी खड्डे पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळेच रस्ता पुन्हा खराब झाला आहे, असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. याप्रकरणी एक त्र्ययस्थ चौकशी समिती स्थापन करून दोषी अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे.