मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या ‘सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार’ या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आंबेडकर यांनी टीका केली. तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात, असे वाटते का, असा सवाल त्यांनी अजित पवार यांना केला.
सोयाबीनसाठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ५,३२८ रुपये असूनही शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत असल्याचा मुद्दा मांडत आंबेडकर म्हणाले की याचा अर्थ शेतकऱ्यांना जवळजवळ ३० टक्के तोटा सहन करावा लागत आहे.
कापसाची स्थितीही तितकीच गंभीर आहे. अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांतील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी एक पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या अशी खंतही आंबेडकर यांनी व्यक्त केली.