कोपरगाव तालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती जवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर बसमधील काही जण जखमी झाले. हायवेवरून जात असताना कार आणि बसची धडक झाली. मात्र ती एवढी भीषण होती ती तत्क्षणी कारने अचानक पेट घेतला आणि बघता बघता ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सगळं जळून खाक झालं. या भयानक आगीमध्ये कारचालकाचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातानंतर हायवेवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी झाली होती. मुजाहिद शेख (वय 31) असे मृत चालकाचे नाव असून त्याच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर
नेमकं घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती जवळ काल रात्री 10 च्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गावरून जात असताना कार आणि खाजगी बसची जोरदार धडक झाली. कारने लगेच पेट घेतला आणि मोठी आग लागली.
एमएच 01 क्यूसी 3516 क्रमांकाची लक्झरी बस ही कोपरगाव येथून येवलाच्या दिशेने जात होती. मात्र ती बस भास्कर वस्तीजवळ येताच समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. त्यामुळे कारला आग लागली आणि त्यात बसलेल्या कारचालक मुजाहिद शेख हा गाडीतच अडकला आणि आगीमुळे होरपळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बचावासाठी नागरिकांनी घेतली धाव
तर या धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघात होताच प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला. अपघाताचे वृत्त समजताच कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अग्निशामक दल तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले. अखेर 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही पथकांनी संयुक्तपणे काम करत त्या कारला लागलेली आग विझवण्यात यश मिळवले. पण तोपर्यंत कारचालकाचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान अपघातामुळे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोपरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.