Girls Missing and Kidnapping Cases: मायानगरीत येण्यासाठी गावातून पलायन करणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण कमी नाही. पण आता मायानगरीतूनच दिवसाकाठी ४ ते ५ मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये (Kidnapping) धक्कादायक वाढ झाली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० महिन्यांत (जानेवारी ते ऑक्टोबर) मुलींच्या अपहरणाचे १,१८७ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच दिवसाला सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत आहेत. यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. आयांची काळजी वाढली आहे.
पोलिसांकडे १,१८७ गुन्ह्यांची नोंद
गेल्या दहा महिन्यात मायानगरीत मुलींचे अपहरण, पळून गेल्याच्या आणि मुलगी गायब होण्याचे ११८७ गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल झाले आहे. यामधील १११८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर इतर जवळपास ७१ प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. आर्थिक राजधानीत यामुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यंदा ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक गुन्हे
मुलींचे अपहरण आणि बेपत्ता होण्याचे सर्वाधिक गुन्हे ऑक्टोबरमध्ये नोंदवण्यात आले आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात अपहरणाचे १३६ गुन्हे नोंद झाले होते, ज्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.जानेवारी ते ऑक्टोबर या काळात महिलांसंबंधित एकूण ५,८८६ गुन्हे नोंद झाले, ज्यात १,०२५ बलात्काराच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या बलात्कारांच्या प्रकरणांपैकी ५२६ गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत.
गुजरात, राजस्थानशी पक्के कनेक्शन
मुलींच्या बेपत्ता होण्यामागे अनेक कारणं समोर येत आहे. पोलिसांनी अनेक प्रकरणांचा उलगडा केल्यानंतर या कारणांचं विश्लेषण केले. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रेम प्रकरणातून पळून जाणे, किरकोळ वादातून घर सोडणे, तसेच मुली सेक्स स्केट (Sex Skate) आणि मानवी तस्करीच्या (Human Trafficking) शिकार बनण्याचे प्रमाणही अधिक आहे. तर पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये अल्पवयीन मुलींना राजस्थान, गुजरातसारख्या ठिकाणी लग्नासाठी तस्करी करण्याची प्रकरणे समोर आली आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेत १,१८७ पैकी १,११८ गुन्ह्यांची उकल केली असून, समुपदेशनानंतर मुलींना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाते.