मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी मोठा निर्णय घेतला असून, त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटे यांना चांगलंच भोवलं आहे, हे प्रकरण 1995 सालचं आहे, या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर आता नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वारंट जारी केलं आहे, शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी आज उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. हाय कोर्टाकडून देखील कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही. सध्या कोकाटे हे लिलावरी रुग्णालयात उपाचर घेत आहेत, दरम्यान त्यांनी दिवसभरात घडलेल्या घडामोडींनंतर अखेर आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कोकाटे यांचं मंत्रिपद काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोकाटे यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं कोणाला दिलं जाणार याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली होती, यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की त्याबद्दलचा निर्णय हे उपमुख्यमंत्री अजित पवारच घेतील, त्यामुळे आता कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडा मंत्रालयाचा पदभार अजित पवार यांच्याकडे आला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात मोबाईलवर रम्मी गेम खेळल्याचा आरोप करण्यात आला होता, यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला होता, तेव्हा देखील माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती, मात्र तेव्हा त्यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता तर मंत्रिपद बदलन्यात आलं होतं, त्यांच्याकडे पूर्वी कृषी खातं होतं.