“आमची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि चर्चा संपलेली आहे. जागा वाटपाबद्दल बोलणी संपलेली आहेत. कोणी कुठे लढायचं यावर एकमत झालेलं आहे. कोणती अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या, त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकेर यांनी लक्ष घालून दूर केल्या आहे. सर्व कार्यकर्त्यांच समाधान होईल याची काळजी घेतली आहे. कार्यकर्त्यांचा मान आणि भावना राखायच्या असतात. आज आमची शेवटची बैठक होती असं मी मानतो. येत्या एक-दोन घोषणा होईल” असं संजय राऊत यांनी सांगितलं. मविआमध्ये काँग्रेसने नगरपालिकेत चांगलं यश मिळवलय. त्यांना पालिका निवडणुकीसाठी सोबत घेणार का?. “नक्कीच शेवटपर्यंत आमचे प्रयत्न सुरु राहतील. काँग्रेस मविआमधील प्रमुख पक्ष आहे. काँग्रेसची स्वत:ची व्होटबँक आहे. आमच्यातला राष्ट्रीय पक्ष आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढवल्या. त्यांच्या काही अडचणी आहेत. राज ठाकरें संदर्भात त्यांची भूमिका आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व घटकांना एकत्र यावं लागेल. त्यांच्या महाराष्ट्रातील, दिल्लीतील नेत्यांशी आम्ही बोललो. त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चर्चा सुरु आहेत. अजून 72 तास आहेत. काँग्रेस आणि आमच्यात कोणतीही कटुता नाही. आम्ही त्यांची अडचण समजून घेतो” असं संजय राऊत म्हणाले.
मशीनची सेटिग तीच
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांना विचारण्यात आलं. “विधानसभेचे निकाल पाहता मशीन तशीच सेट आहे. 120-125 भाजप, शिवसेनेचे 54 विधानसभेला आणि 40-41 अजित पवार. आकडे तेच आहेत. मशीनची सेटिग तीच कायम आहे. आकड्यात अजिबात बदल झालेला नाही. भाजपने मशीन त्याचं पद्धतीने फिट केल्या. आकडे तरी बदलायला पाहिजे होते” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
एका-एका नगरपरिषदेसाठी 150-150 कोटी खर्च
“पैशांची जी गारपीट झाली, त्या गारपिटीपुढे कोणी टिकणार नाही. 30 कोटी बजेट असलेली नगरपालिका जिंकण्यासाठी भाजप, शिंदे गट 150-150 कोटी खर्च करतो. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चार्टर फ्लाइट, हेलिकॉप्टरचा वापर झाला. स्पर्धा इथे सत्ताधारी पक्षातच होती. पैशांचा प्रचंड धुरळा उडाला” अशी टीका संजय राऊत यांनी केली.