पिंपरी, ता. १९ ः पर्यटन क्षेत्रात गेल्या २२ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या ‘वारी’ या कंपनीने पुण्यातील आपटे रोड येथे आपली नवी शाखा सुरू केली आहे. या शाखेचे उद्घाटन नुकतेच झाडले. यावेळी ट्रॅव्हल एजन्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव याझदी मार्कर, पदाधिकारी विजयशे ठक्कर, अमित पंडित, सचिन परदेशी व सुधाकर तापकीर आवर्जून उपस्थित होते.
‘वारी’चे संचालक मारुती मुसमाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कंपनीच्या २००४ पासूनच्या वाटचालीविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. कंपनीचे दुसरे संचालक ऋषिकेश मुसमाडे व गायत्री गावडे मुसमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीची रावेत आणि पिंपळे सौदागर येथे सुसज्ज कार्यालये कार्यरत आहेत.
ऋषिकेश मुसमाडे म्हणाले, ‘कंपनीद्वारे सर्व पर्यटकांना प्रत्यक्ष सहलीवर चांगल्यात चांगली सुविधा प्रदान करण्यावर भर दिला जातो. सहलीमध्ये पर्यटकांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक पर्यटकांवर वैयक्तिक लक्ष देता येते. तसेच आमच्या सहलीमध्ये प्रसिद्ध स्थळाबरोबर तेथील काही खास वेगळा अनुभव घेण्याचा लाभ पर्यटकांना मिळतो. ‘कॅरी झिरो मनी’ अशा पद्धतीने सहलीचे नियोजन केले जाते.’
सहलीचे नियोजन, सहलीदरम्यान पर्यटकांना आलेले चांगले अनुभव, उत्तम आदरातिथ्य तसेच भारतीय पर्यटन मंत्रालयाने लागू केलेल्या अटी व शर्तींनुसार सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे काटेकोर पालन केल्याबद्दल २०२४ साली भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून कंपनीला शिफारसपत्र जारी करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. संचालक गायत्री गावडे-मुसमाडे यांनी आभार मानले.
-----