चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीने हलविला कचरा
esakal February 21, 2026 03:45 AM

आळंदी, ता. २० : जळालेल्या कचऱ्यापासून होणाऱ्या धुराचे प्रदूषण उपद्रव टाळण्यासाठी चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत मार्फत गायरानातील जळालेला कचरा जेसीबीच्या माध्यमातून हलवून एका खड्ड्यामध्ये जमा केला जात आहे. नव्याने येणारा कचरा हा गायरानातील अन्यत्र जागेत वर्गीकरण केला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब बिंदले यांनी दिली.
बिंदले म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत हद्दीत दिवसाला दीड टन कचरा तयार होतो. दरम्यान मागील काही दिवसात अज्ञात व्यक्तींनी कचरा डेपोला आग लावल्यामुळे संपूर्ण कचरा आगीच्या भक्ष्य स्थानी पडला. जळालेला कचरा धूपत असल्याने त्यातून धुरासारखे प्रदूषण येऊ लागले. प्रदूषणाचा उपद्रव नागरिकांना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जळालेला कचरा जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून उचलून अन्यथा जागेमध्ये हलवला जात आहे. गायरानात एका बाजूला खड्डा करून त्यामध्ये कचरा साठवला जात आहे. याचबरोबर अधून मधून टँकरने पाणी मारून कचरा डेपोतील आग आटोक्यात आणली जात आहे. ग्रामपंचायत हद्दीतून नवीन येणारा कचरा हा अन्यत्र गायरानात वेगळ्या ठिकाणी जमा केला जात आहे.’’
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या सोबत आळंदी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन जागेमध्ये एकत्रित कचरा गोळा केला जावा आणि त्यावर प्रक्रिया केली जावी या संबंधात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आर्थिक सक्षम नसल्याने घनकचरा व्यवस्थापन आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.