Nashik Crime News : नाशिक-मुंबई महामार्गालगत (Nashik Mumbai Highway) असलेल्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अंदाजे 25 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सारूळ शिवारातील निर्जन रानात तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-मुंबई महामार्गाजवळील एका ओसाड ठिकाणी आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एका तरुणीचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे सुमारे 25 वर्ष वयोगटातील तरुणी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली.
प्राथमिक पाहणीत तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना मृतदेहाजवळ पिझ्झाचा बॉक्स तसेच काही खाद्यपदार्थ आढळून आले. त्यामुळे ही तरुणी कोणासोबत येथे आली होती का, किंवा तिने येथे अन्न मागवले होते का, या शक्यतांवरून तपास सुरू आहे. तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही.
ही हत्या घटनास्थळीच झाली की अन्यत्र हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकण्यात आला, याचाही शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तपासासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून घटनास्थळावर सापडलेल्या वस्तूंच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या