वारकरी विद्यार्थ्याचे आळंदीतून अपहरण
esakal February 21, 2026 12:45 PM

आळंदी, ता. २० : वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचे शुक्रवारी(ता. १३) फूस लावून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना आळंदीत (ता. खेड) येथे घडली. विठ्ठल नामदेव पेंढारकर (वय १४, रा. ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था, घुंडरे गल्ली, आळंदी), असे अपहृत बालकाचे नाव आहे.
याबाबत संस्थाचालक पांडुरंग रामदास जाधव (रा. घुंडरे गल्ली- आळंदी) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १९) फिर्याद दिली. त्यानुसार पांडुरंग जाधव यांच्या आळंदी येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी विद्यार्थ्यांना सांप्रदायिक शिक्षण दिले जाते. अपहृत विठ्ठल पेंढारकर हा चौदा वर्षीय विद्यार्थी त्यांच्याकडे निवासी राहायला आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेले. तो रंगाने सावळा, अंगाने सडपातळ आहे. त्याचे नाक सरळ आहे. त्याची उंची चार फूट आहे. केस बारीक आणि डोक्यावर शेंडी व गोल चेहरा आहे. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तो मराठी व हिंदी भाषा बोलतो. त्याने काळी पॅन्ट पिवळा टी- शर्ट परिधान केलेला आहे.
दरम्यान, मागील सहा दिवसांत वारकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाची ही दुसरी घटना आहे. अपहरण झाले की पळून गेला की बेपत्ता, याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. वारकरी विद्यार्थ्यांबरोबरच १४ ते १८ वयोगटातील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढले आहे. आळंदीसह केळगाव, चिंबळी, मरकळ, चऱ्होली हे प्रमाण वाढले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.