अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
घुसखोरांच्या वाढत्या संख्येने स्थानिक भयभीत
टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : खडवली व ग्रुप ग्रामपंचायत बेहेरे येथील अनधिकृत बांधकामे व बाहेरील नागरिकांची वाढती वस्ती यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रुप ग्रामपंचायत बेहेरे हद्दीत आणि मध्य रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी व घुसखोरांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून खडवली व ग्रुप ग्रामपंचायत बेहेरे भागातील वाढत्या बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा चर्चेत आहे. अशातही, न्यायव्यवस्थेचे नियम धाब्यावर बसवून बांधकामे सुरूच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. खडवलीतील स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणी, रस्ता व वीज या मूलभूत समस्यांना सामोरे जात आहेत. त्यातच बाहेरील नागरिकांची वाढती संख्या पाहता भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी प्रशासनाने ठोस आणि पारदर्शक भूमिका घ्यावी, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
बेकायदेशीर वृक्षतोड
अनधिकृत बांधकामांच्या आड येणारी झाडे तोडल्याच्या घटनाही समोर आल्याचा आरोप पर्यावरणमित्र व पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंदलाल प्रजापती यांनी केला आहे. निष्क्रिय प्रशासन यासाठी जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
केवळ दिखाऊ कारवाई
टिटवाळा पूर्वेकडील इंदिरानगर आणि बल्याणी बनेली मातादी मंदिरावर असलेल्या टेकडी परिसरात बेकादेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी व घुसखोरांची संख्या वाढत आहे. याला कारण वाढती अनधिकृत बांधकामे असून, केवळ दिखाऊ कारवाई करणारे बेजबाबदार व निष्क्रिय अधिकारी असल्याचा आरोप बजरंग दलाचे सहमंत्री लक्ष्मीकांत पाठक यांनी केला आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. बांधलेल्या चाळीत कोण व्यक्ती राहते, हे पाहणे माझे काम नाही. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे हे माझे कर्तव्य आहे.
- जयवंत चौधरी, वॉर्ड अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, अ प्रभाग