टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरू आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला आणि दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताने हा सामना 76 धावांनी गमवल्याने नेट रनरेट हा -3.850 इतका घसरला आहे. त्यामुळे हा नेट रनरेट सुधारण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. असं असताना गुरूवारी झिम्बाब्वे विरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकणं भाग आहे. त्यात नेट रनरेट सुधारण्याची जबाबदारीही असणार आहे. भारताने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियाकडून सांघिक कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज आणि फिनिशर म्हणून ख्याती असलेला रिंकु सिंहला अचानक अलिगडला घरी जावं लागलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. टीम इंडियात सर्व काही व्यवस्थित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिंकु सिंहला वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरी परतावं लागलं आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, मंगळवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या भारताच्या सराव सत्रात रिंकूने भाग घेतला नाही, तर त्याचे उर्वरित सहकारी नेटवर उपस्थित होते. रिंकू सिंग कुटुंबातील आपत्कालीन परिस्थितीमुळे घरी परतला आहे. खानेंद्र सिंह यांना गंभीर प्रकृतीत ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे रिंकु सिंहला ताबडतोब परतावे लागले आहे. बीसीसीआयने रिंकू कुठे आहे याबद्दल अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे गुरूवारी होणाऱ्या सामन्यात रिंकु सिंहचं खेळेल की नाही हे कठीण आहे.
रिंकु सिंह या स्पर्धेत काही छाप टाकू शकलेला. आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अमेरिकेविरुद्ध 6, नामिबियाविरुद्ध 1, पाकिस्तानविरुद्ध 11 आणि नेदरलँडविरूद्ध 6 धावा करून बाद झाला. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून फार अपेक्षा होती. मात्र या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. आता रिंकुच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजू भक्कम होतील. कारण अक्षर पटेल दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात खेळला नव्हता.