Ramdas Athawale On Ward System : महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धत ही अनेकांसाठी अडचणीची ठरली. विशेषतः छोट्या पक्षांवर या नवीन पद्धतीने गंडातर आले. मोठ्या प्रभागात प्रचारासाठी आणि खर्चासाठी त्यांची चांगलीच दमछाक झाली. इतके करूनही अनेक ठिकाणी छोट्या पक्षांना आणि अपक्षांना यश खेचून आणता आले नाही. तर काही ठिकाणी लहान पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या पक्षांवर निवडणूकीत पैसे वाटपाचे आणि मतदार पळवल्याचे आरोप केले. त्याचवेळी आता प्रभाग पद्धती रद्द करा अशी मागणी करत रिपाई नेते रामदास आठवले यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
रामदास आठवलेंचा दावा काय?
छोट्या मोठ्या पंचायत आणि महानगर पालिकांमध्ये आम्ही जागा जिंकत होतो. पण प्रभाग पद्धतीमुळे आमचे लोक निवडून येत नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहोत की प्रभाग यंत्रणा रद्द करावी. आमची ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला. प्रभाग पद्धत ही छोट्या पक्षांच्या मृत्यूचा मसुदा असल्याचा आरोप राज्यातील अनेक महापालिकांमध्ये करण्यात आला. आता रामदास आठवले यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
जागा न मिळाल्याने नाराजी
आम्हाला अजून दोन राज्यात परवानगी मिळाली तर, आम्ही राष्ट्रीय पक्ष होऊ. बऱ्याच राज्यात आमच्या शाखा आहेत तिथे फायदा होतो आहे. पण महाराष्ट्रात आम्हाला फायदा होत नाही आम्हाला जागा दिल्या जात नाही. पण ज्या जागा मिळतील त्या आपल्या चिन्हावर लढल्या पाहिजे. मित्रपक्षाच्या चिन्हावर लढलो तर आपल्या पक्षाचे नाव होणार नाही. आपल्या भरपूर जागा निवडून आल्या पण कोण कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तेच कळत नाही, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
काही ठिकाणी बोगस मतदान होत आहे. डुप्लिकेट मतदार देखील बऱ्याच ठिकाणी आहेत, काही ठिकाणी मृतांचे देखील नाव यादीमध्ये आहे. काही लोकांचे नाव हे मतदार यादीत एकपेक्षा जास्त ठिकाणी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली.
महाविहारावर बुद्धिष्ठ ट्रस्टी हवा
जगात अनेक विचारवंत झाले पण गौतम बौद्ध हेच क्रांती विचार देणारे राहिले, बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने आमची मागणी आहे की, महाविहारमध्ये अध्यक्ष आणि ट्रस्टी बुध्दिष्ठ असावा. बिहार सरकारकडे आम्ही मागणी केली असून, त्यांना भेटलो आहे. पंतप्रधान यांना देखील मी निवेदन दिले आहे. कायद्यामध्ये बदल करून अध्यक्ष, ट्रस्टी हे बुद्धीष्ट असायला हवे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मामध्ये आमचे ट्रस्टी नाही तर आमच्या विहार मधेही आमचे बुद्धिष्ठ हेच ट्रस्टी असले पाहिजे इतर कुणी नको अशी मागणी असल्याचे आठवले म्हणाले.