तात्या लांडगे
सोलापूर : उजनी धरणात सध्या ९७ टीएमसी पाणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात सहा टीएमसी पाणी अधिक आहे. गतवर्षी डिसेंबर व फेब्रुवारीत पाणी सोडावे लागले होते, पण यंदा १७ जानेवारीपासून पाणी सोडण्यात आले. दुसरीकडे सोलापूर शहरासाठी देखील नदीतून पाणी सोडावे लागले नाही. आता उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दोनदा पाणी मिळणार असून पहिले आवर्तन २० मार्चनंतर सोडले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींसह, सोलापूर शहर, कर्जत, इंदापूर, धाराशिव या शहरांची तहान उजनी धरणावरच भागते. उजनी धरणावर ४२ पाणीपुरवठा योजना अवंलबून असून त्यासाठी दोन-अडीच महिन्याला एक टीएमसी पाणी लागते. दरम्यान, सोलापूर शहरासाठी आता १७० एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनी झाल्याने अडीच-तीन महिन्याला भीमा नदीतून सोडावे लागणारे पाणी बंद झाले आहे. सोलापूर शहरासाठी नदीतून दरवर्षी चार आवर्तनातून १८ ते २० टीएमसी पाणी सोडावे लागत होते. आता सोलापूर शहरासाठी नव्हे पण नदी काठावरील गावे, जनावरांसाठी भीमेतून आणखी एकदा पाणी सोडले जाईल. त्यामुळे पाण्याची बचत होऊन यंदा पावसाळा सुरु होईपर्यंत धरणातील साठा उणे होणार नाही, असे अधिकारी सांगतात.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना यंदाच्या कडक उन्हाळ्यात ४०-४० दिवसांची दोन आवर्तने मिळणार आहेत. २० मार्चनंतर सुरु झालेले पाणी मेअखेर बंद होईल. आता उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी व लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा, यातून दोन्ही आवर्तनाचे वेळापत्रक कालवा सल्लागार समितीत निश्चित होईल. प्रत्येक आवर्तनासाठी सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.
‘कालवा सल्लागार’ची नाही बैठक
उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचे उन्हाळ्यात नियोजन करण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होते. त्यात जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतात. त्या बैठकीत शेतीसाठी किती आवर्तने, पिण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे, याचे नियोजन अंतिम होते. मात्र, सध्या उन्हाळा सुरु झाला तरीदेखील कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पाण्याचे नियोजन झालेले नाही. पुढील आठ-दहा दिवसांत ही बैठक अपेक्षित आहे.
उजनीची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
९७ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
३३.५० टीएमसी
पाण्याची टक्केवारी
६२.४९ टक्के
पहिले आवर्तन
२० मार्चनंतर