टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा खूपच महत्त्वाचा होता. कारण या सामन्यापूर्वी दव फॅक्टर आणि इतर गोष्टींची चर्चा होत होती. त्यामुळे भारताने नाणेफेक जिंकावी आणि प्रथम गोलंदाजी घ्यावी अशी इच्छा क्रीडाप्रेमींची होती. पण तसं झालं नाही. भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे आता टीम इंडियाला 200 पार धावा करण्याशिवाय पर्याय नाही असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण 160-170 धावा जिंकण्यासाठी दिल्या तर हे आव्हान रोखणं गोलंदाजांना कठीण जाईल. असं असताना नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर सूर्यकुमार यादवने काय घेतलं असतं असा प्रश्न अनेकांना पडला. त्याने या प्रश्नाचं उत्तर नाणेफेकीनंतर लगेच दिलं.
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. सूर्यकुमार यादवचं उत्तर ऐकून टीम इंडियाच्या मनासारखं झाल्याचं दिसत आहे. पण हा निर्णय खरंच योग्य ठरले का? हे सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, उपांत्य फेरी, मोठा सामना, आणि वाराही आहे. जास्त दव पडेल असे वाटत नाही. खेळपट्टी चांगली दिसतेय. सर्व क्युरेटर आणि ग्राउंड्समनना याचं श्रेय जाईल. सूर्यकुमार यादवच्या मनसारखा निर्णय झाला आहे. पण दुसऱ्या डावात दव पडेल की नाही हे काही सांगता येत नाही. जर दव पडला तर गोलंदाजांना खूपच कठीण जाईल.
कर्णधार सूर्यकुमार यादव या महत्त्वाच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये कोणाला प्राधान्य देणार याची उत्सुकता होती. पण त्यातही त्याने काही बदल केलेला नाही. सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला संघ यावेळी मैदानात उतरणारआहे. खासकरून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंग करतील असं दिसत आहे. त्यामुळे संजू सॅमसन आणि इशान किशन ओपनिंग करेल या चर्चा हवेतच विरल्या आहेत.