साहित्याच्या वाचनातून व्यक्तिमत्व घडवा
esakal March 06, 2026 07:46 AM

साहित्याच्या वाचनातून व्यक्तिमत्त्व घडवा

साहित्यिक प्रदीप कांबळे; दहिवडी कॉलेजमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात

दहिवडी, ता. ५ : आपली मातृभाषा आईसारखी सोज्वळ आणि सामावून घेणारी आहे. आज संगणकीय युगात हरवत चाललेला संवाद पुन्हा मिळवण्यासाठी नातेसंबंध जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सातारा येथील प्रसिद्ध साहित्यिक व निवेदक प्रदीप कांबळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजमध्ये अग्रणी महाविद्यालय योजना, मराठी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात झाला. यानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बाेलत होते. मराठी विभागप्रमुख प्रा. प्रवीण भोसले, डॉ. अनुसया इमडे, मान्यवर उपस्थित होते.
श्री. कांबळे यांनी मराठी भाषेच्या उत्पत्तीपासून ते आधुनिक साहित्यापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला. ते म्हणाले, ‘‘पुरातन काळातील शिलालेखांपासून ते १२ व्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’रपर्यंत मराठीने आपले अस्तित्व जपले आहे. संत साहित्याने मराठीला लोकमानसातील भाषा बनवले. केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके न वाचता अवांतर वाचन केल्यानेच सर्जनशीलता वाढते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांनी गरुड झेप घेण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर व उपप्राचार्या डॉ. मीरा देठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते. प्रा. प्रवीण भोसले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनुसया इमडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी ग्रंथपाल प्रा. विष्णू वाघेरे, प्रा. इंद्रजित ऐवळे, प्रा. अरुण कट्टे, डॉ. प्रकाश जमदाडे, डॉ. शिवशंकर लेकुरवाळे, प्रा. नीतेश गांगवे, डॉ. अनिरुद्ध भोसले यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

.........

B07336
दहिवडी : कार्यक्रमात बोलताना प्रदीप कांबळे. यावेळी उपस्थित मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
..........

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.