महसुली समस्यांचे होणार निराकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः नागरिकांच्या महसुली तक्रारी आणि समस्यांचे जलद व प्रभावी निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १’ रत्नागिरी तालुक्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
समाधान शिबिरांचे आयोजन उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, विविध दाखले तात्काळ देणे, एक खिडकी योजनेअंतर्गत तक्रार निवारण तसेच अभिलेख सातबारा दुरुस्ती संदर्भातील हेल्प डेस्क व मार्गदर्शन यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खालगाव ११ मार्च, कोतवडे १४ मार्च, तरवळ १८ मार्च, जयगड २५ मार्च, पावस १ एप्रिल, टेंबे ८ एप्रिल, फणसोप १० एप्रिल, मालगुंड १७ एप्रिल, खेडशी ५, रत्नागिरी ८ मे २०२६ या कालावधीत शिबिरे आयोजित केली आहेत.