युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानं जगातील अनेक देशांमध्ये गंभीर स्वरुपाची इंधन टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू असल्यामुळे आता कच्चे तेल महाग होण्याची शक्यता आहे. दरम्यान कच्चे तेल महागल्यास पेट्रोल-डिझेलचे दर देखील वाढणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होताच पाकिस्तानमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 60 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान यु्द्धामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते, पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात, अशी भीती सर्वांच्याच मनात आहे. मात्र आता सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्र सरकारच्या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
भारतामध्ये सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात येणार नाहीये. सध्या युद्ध सुरू आहे, कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात, मात्र अशाही परिस्थितीमध्ये देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ज्या प्रमाणे पट्रोल, डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही, त्याच प्रमाणे इंधनाचे दर कमी देखील होणार नाहीयेत, कारण सध्या पेट्रोल, डिझेलवर असलेली एक्साइज ड्यूटी कमी करण्याचा कोणताही विचार केंद्र सरकारचा नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात पुरसा इंधनाचा साठा आहे.
जेव्हा मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला त्याच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्र सरकारकडून इंधनाच्या सोर्सवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढतच आहेत. दरम्यान भारतानं इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे.