टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान रिंकु सिंह यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं होतं. त्यामुळे स्पर्धा अर्धवट सोडून घरी परतावं लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रिंकु सिंहचे वडील कर्करोगामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. रिंकु सिंहला हा धक्का स्पर्धा सुरू असताना बसला होता. रिंकु तात्काळ घरी परतला आणि वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. त्यानंतर रिंकुने घरी शोक व्यक्त करत न बसता टीम इंडियाच्या ताफ्यात रूजू झाला. भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं. त्यानंतर रिंकु सिंहने वडिलांसाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने वडिलांचं छत्र हरपल्याने काय होणार याची कल्पना सांगितली आहे. तसेच वडिलांच्या निधनानंतर टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी परतण्याचं कारण सांगितलं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर रिंकु सिंहने इंस्टाग्राम पोस्टमध्ये वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच पोस्टमध्ये लिहिलं की, तुमच्या बोलल्याशिवाय इतके दिवस कधीच काढले नाहीत. मला माहिती नाही की तुमच्याशिवाय पुढचं जीवन कसं जाईल. मला प्रत्येक पावलावर तुमची गरज भासणार आहे. रिंकु सिंहने पुढे लिहिलं की, ‘तुम्हीच शिकवलं होतं की कर्तव्य सर्वात पुढे असतं. त्यामुळे मैदानात तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. आता तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण असं वाटतं की कदाचित तुम्ही माझ्या जवळ असता. प्रत्येक छोट्या आनंदात तुमची उणीव भासणार आहे. तुमची उणीव मला कायम भासत राहील पापा.. खूपच जास्त’
रिंकु सिंहची बॅट काही टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चालली नाही. त्याला 5 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण त्याने 8 च्या सरासरीने फक्त 29 धावा केल्या. त्यामुळे बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याता आला. संजू सॅमसनला संघात जागा मिळाली. संजू सॅमसनने संधीचं सोनं केलं. दरम्यान, रिंकु सिंहचं टी20 संघातील स्थान कायम राहिल की नाही हे सांगता येणं कठीण आहे. पण आयपीएलमधील कामगिरीवर आता पुढचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. रिंकु सिंह आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळणार आहे.