पारगाव, ता.१० : इस्रायल-इराण युद्धाच्या झळा आंबेगाव तालुक्यातील कांदा उत्पादकांना बसू लागल्या आहे. निर्यात थांबल्याने कांद्याच्या बाजारभाव कोसळले आहेत. दुसरीकडे, कच्च्या मालाअभावी कांदा पिशव्यांच्या (बारदान) किमतीत दुप्पट वाढ झाली असून बाजारात त्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे रब्बी हंगामातील कांद्याची निर्यात विस्कळीत झाली आहे. सध्या कांद्याला प्रतिकिलो केवळ आठ ते १० रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असे वाळुंजनगर येथील शेतकरी महेंद्र वाळुंज यांनी सांगितले.
कांदा साठवणुकीसाठी लागणाऱ्या लाल प्लास्टिक पिशव्यांचे दरही युद्धामुळे भडकले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ९ ते १० रुपयांना मिळणारी पिशवी आता १६ ते १८ रुपयांवर पोहोचली आहे. पैसे मोजूनही पिशव्यांचा पुरवठा होत नसल्याचे व्यापारी सचिन भोसले यांनी नमूद केले. कच्चा माल उपलब्ध नसल्याने उत्पादन कंपन्यांकडून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
06718