दुय्यम निबंधक कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित
अवघ्या ८ हजारांची थकबाकी
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कर्णिक रोड येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये आज प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळाला. अवघ्या ८ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. याचा थेट फटका शेकडो नागरिकांना बसला असून, मालमत्ता नोंदणीची महत्त्वाची प्रक्रिया तासनतास ठप्प झाली होती.
वीज नसल्याने कार्यालयात अंधार पसरला होता, तर संगणकीय प्रणाली बंद पडल्याने दस्तऐवज नोंदणी पूर्णपणे थांबली. त्यामुळे कल्याण आणि परिसरातील दुर्गम भागातून मालमत्ता नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात कार्यालयाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. कामानिमित्त आलेल्या गर्भवती महिला, लहान मुले घेऊन आलेल्या माता आणि वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी किंवा पिण्याच्या पाण्याचीही साधी सोय नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
एकीकडे नागरिक उन्हाने आणि कामाच्या विलंबामुळे हैराण झाले असताना, कार्यालयातील काही कर्मचारी मात्र आपले कर्तव्य विसरून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष रजा काढून आलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर तीव्र शब्दात टीका केली आहे.