मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातही परिणाम झाला असून गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली होती. याचा फटका गृहिणींसीह हॉटेल मालक, छोटे व्यावसायिक यांनाही बसला. घरात परिणाम झाला तसेच बाहेर खाणंही मुश्किल झालं. त्यातच गॅस कंपनीकडून सिलेंडर वितरणाचे निकष बदलल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्राहकांचं धाबं दणाणलं. राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅससाठी रांगा लागल्या. काही शहरांत लोकं पहाटेपासून उभे होत तर काहींना भर उन्हा गॅससाठी आटापिटा करावा लागला. राज्यभरात काय परिस्थिती त्यावर नजर टाकूया.
रत्नागिरी गॅस एजन्सीच्या बाहेर पोलीस तैनात
रत्नागिरी- गॅस कंपनीकडून सिलेंडर वितरणाचे निकष बदलल्याने रत्नागिरी गॅस एजन्सीच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात घरगुती गॅसचे वितरण करण्यात आलं. गॅस एजन्सी उघडल्यापासून पोलीस बंदोबस्त तैनातन होता. निकष बदलल्याने ग्राहकांचा वाद होण्याच्या शक्यतेने गॅस एजन्सीने बंदोबस्ताची मागणी केली होती. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात गॅस एजन्सी बाहेर पोलीस आहेत. दोन गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांसाठी दोन सिलेंडर मधील बुकिंग अंतर आता 35 दिवसांचे झालं आहे, तर ज्यांच्याकडे 1 सिलेंडर आहे, त्यांना 25 दिवसानंतर बुकिंग करता येणार आहे.
अमरावतीमध्येही सिलेंडरसाठी मोठी गर्दी
अमरावती शहरातील बाजार समिती परिसरात असलेल्या एचपी गॅस सिलेंडरच्या एजन्सीवर ग्राहकांची रांग लागली. भर उन्हात सिलेंडर साठी ग्राहक ताटकळत उभे होते. एकीकडे प्रशासन म्हणतं की सिलेंडरचा तुटवडा नाही मात्र सिलेंडरसाठी गर्दी कायम होती.
साताऱ्यात गॅससाठी लोकांची झुंबड
इराक मधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सातारा जिल्ह्यातील गृहिणींच्या स्वयंपाकघराला बसला. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या या संकटामुळे गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील गॅस पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने आता कडक पावले उचलली असून ग्रामीण भागात गॅस पोहोचवण्याचे आदेश दिल्यामुळे सर्व तालुक्यात ग्रामीण भागात सिलेंडरचे वितरण गावोगावी होत आहे. कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजने गावात जेव्हा सिलिंडरची गाडी दाखल झाली, तेव्हा नागरिकांनी अक्षरशः सिलेंडर घेण्यासाठी झुंबड पाहायला मिळाली. या गर्दीमुळे गॅस वितरण कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचे खटके अनेक गावांमध्ये गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचे वादावादीचे प्रसंग देखील उद्भवले असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून खटाव कोरेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पोलीस बंदोबस्तात वितरण करावे लागत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी देखील सिलेंडरच्या काळाबाजार बाबत कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत 40 सिलेंडर जिल्ह्यातून जप्त करण्यात आले असल्याची माहिती वैशाली राजमाने यांनी दिली .
अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून रांगा…!
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गॅस सिलेंडरच्या टंचाईची समस्या गंभीर होताना दिसत आहे. तर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत असून, पहाटे पाच वाजल्यापासूनच गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रारही समोर आली. काही ठिकाणी पुरवठा अपुरा असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून दरम्यान, संबंधित प्रशासन आणि गॅस एजन्सीकडून पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
ठाणे शहापूर तालुक्यातील किनवलीमध्ये गॅससाठी लांबच लांब रांगा
शहापूर तालुक्यातील किनवली मध्ये गॅस घेण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ग्राहक सकाळपासून गॅस वितरण ऑफिस बाहेर रांगा लावूनउभे होते. आखाती देशातील युद्धाचा परिणाम गॅसवर झाल्याचा कारणास्तव गॅस तुटवडा झाल्याच्या कारणाने ग्राहकांची गॅस भरून घेण्यास तुंबळ गर्दी झालेली दिसून आली.