तात्या लांडगे
सोलापूर : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी, सीएनजी मिळत नाही, ३२ रुपयांनी भाव वाढले आहेत. गॅस भरायला तासन्तास रांगेत उभारावे लागते, अनेक पंप बंद आहेत, अशी कारणे पुढे करत रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे. आता रिक्षातून प्रवास करताना छोट्या टप्प्यासाठी ५ ते १० रुपये आणि लांबच्या प्रवासासाठी १५ रुपये जादा मोजावे लागत आहेत.
मंगळवेढा रोड, अक्कलकोट रोड, ७० फूट रोड या मार्गावर भाडेवाढ केली, पण त्याठिकाणी प्रवाशांची कोणतीही अडचण नसल्याचे रिक्षाचालक सांगतात. पण, होटगी रोड, विजयपूर रोड या मार्गावरील प्रवासी वाद घालत असल्याचेही चालकांनी सांगितले. रेल्वे स्टेशन ते स्टॅण्ड आणि स्टॅण्डपासून रेल्वे स्टेशनपर्यंत यायला आता प्रवाशांना ३० रुपये द्यावे लागत आहेत. १५ दिवसांपूर्वी हा दर १५ ते २० रुपये होता. प्रवाशांना रिक्षा भाड्याने करायची असल्यास ३० ते ५० रुपये आता ज्यादा द्यावे लागत आहेत. अनेक प्रवाशांनी त्यांच्या तक्रारी शहर पोलिस, आरटीओ कार्यालयास कळविल्या आहेत. पण, गॅस तुटवड्यामुळे अधिकाऱ्यांनीही कानावर बोट ठेवल्याची स्थिती आहे.
...म्हणून केली भाडेवाढ
सोलापूर शहर हद्दीतील एलपीजी, सीएनजी पंपांवर गॅस मिळतो, पण त्याठिकाणी रिक्षांसह अन्य वाहनांच्या रांगा आहेत. सध्या सोलापूर शहर हद्दीतील केवळ गो-गॅसचेच तीन पंप सुरू आहेत. त्यामुळे दोन ते अडीच तास तेथे रांगेत थांबावे लागत आहे. पंपांवर गॅसचे लिटरमागील भाव देखील महिनाभरात सुमारे ३२ रुपयांनी वाढले आहेत. पूर्वी ५२ रुपये लिटर मिळणारा गो-गॅस आता ८५ रुपये लिटर झाला आहे. त्यामुळे आम्ही पण प्रवाशांना परवडेल अशी भाडेवाढ केली आहे.
- अमोल डुरके, अध्यक्ष, रिपब्लिकन सेना रिक्षा चालक-मालक संघटना, सोलापूर
विजापूर रोडचे भाडे असे...
मार्ग भाडे
स्टॅण्ड ते सात रस्ता २५ रुपये
स्टॅण्ड ते कलेक्टर ऑफिस ३० रुपये
स्टॅण्ड ते आयटीआय ३५ रुपये
स्टॅण्ड ते रंगभवन २० रुपये
स्टॅण्ड ते सैफूल ४० रुपये
-------------------
होटगी रोडचे भाडे असे...
मार्ग भाडे
स्टॅण्ड ते हत्तुरे वस्ती ५० रुपये
स्टॅण्ड ते मजरेवाडी ४० रुपये
स्टॅण्ड ते आसरा चौक ४० रुपये
स्टॅण्ड ते सात रस्ता २५ रुपये
स्टॅण्ड ते गांधीनगर ३० रुपये
रिक्षा चालकांचा असा मेसेज...
‘तमाम जुळे सोलापूरमधील रिक्षाचालकांना कळविण्यात येते की, गॅसचे वाढते दर वाढले आहेत. त्यामुळे शेअरींग रिक्षाचे दर वाढविण्यात आले आहेत. त्या दरपत्रकाप्रमाणे प्रवाशांकडून भाडे घ्यावे.’ असा मेसेज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकारी रिक्षा चालकांना पाठविला आहे.
तीन हजारांवर रिक्षांची चाके थांबली
सोलापूर शहरात आरटीओकडील नोंदीनुसार १७ हजारांवर रिक्षा आहेत. पण, प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर ३० हजारांपर्यंत रिक्षा धावतात. आता गॅसच्या तुटवड्यामुळे शहरातील तीन हजारांवर रिक्षा थांबून आहेत. गॅसचे वाढलेले दर, बहुतेक पंप काही दिवस बंद आणि पंपावर गॅस भरण्यासाठी भली मोठी रांग, यामुळे रिक्षा थांबून असल्याचे चालकांनी सांगितले.