Maharashtra Weather Update:गेल्या 24 तासांपासून राज्यभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होताना दिसतेय. पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसत आहे. पुढील 4 दिवस राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे इशारे देण्यात आले आहेत. मराठवाडा, विदर्भसह मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाचे हाय अलर्ट देण्य्त आलेत. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने धाराशिवसह बीड आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Weather Update)
या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तोंडचा घास हिरावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (Hailstrom)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ ते दक्षिण भारतापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यभर पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धाराशिव जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, बाजरी तसेच कांदा बियाणे पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून मार्च-एप्रिल या उन्हाळ्याच्या काळात जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, मागील पंधरवड्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी काढणीसाठी तयार असलेल्या गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी सावरत नाहीत तोच काल रात्री पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धडक दिली. जळगाव, भुसावळ, एरंडोल, धरणगाव आणि मुक्ताईनगर तालुक्यांतील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, ज्यामुळे शेतीचे नुकसान अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
नांदेड जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, मका तसेच काढून ठेवलेल्या हळदीसह विविध शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले असून तोंडचा घास हिरावल्याची भावना ते व्यक्त करत आहेत. नांदेड, भोकर, अर्धापूर, उमरी, धर्माबाद आदी तालुक्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील लहान गावात वीज पडून एका शेतकऱ्याची गाय दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आज नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.