आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर येण्याचं प्रमाण वाढतं, याचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन तापते. त्यामुळे सापांच्या बिळातून गरम वाफा निघतात आणि त्याचा सापांना त्रास होतो. त्यामुळे अशावेळी साप बिळातून बाहेर निघतात आणि अशी एखादी सुरक्षित आणि थंड हवेची जागा शोधतात, जिथे त्यांना सहज आश्रय घेता येईल, त्यांना लपता येईल. साप शक्यतो अशावेळी घरात घुसतात आणि जिथे अडगळ असते अशा ठिकाणी लपून बसतात. अशा ठिकाणी साप सहज दिसत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये सर्पदंशाचा धोका देखील वाढतो. दरम्यान जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्यावर उपाय म्हणजे दुसरा कोणताही उपचार न करता थेट अशा व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळून देणं, त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं हाच आहे.
परंतु साप आपल्या घरात येऊ नये यासाठी देखील आपल्याला काही उपाय योजना नक्कीच करता येतील, त्यामध्ये जर साप आपल्या घरात येण्याच्या घटना या वारंवार घडत असतील तर आपण सावध राहिलं पाहिजे, घरात कुठेही अडच किंवा अडगळ राडा ठेवू नये. घराचे कोपरे स्वच्छ ठेवावेत. तसेच जर आपलं घर हे ग्रांउड लेव्हलला असेल तर आपल्या घराच्या आसपासचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे, घराच्या आसपास गवत वाढू देऊ नये. गवत वाढलेलं असेल तर साप दिसणार नाही, त्यामुळे देखील सर्पदंश होऊ शकतो.
तसेच अशा देखील काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असतात ज्या वनस्पतींच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप हा घरात येत नाहीत, तुम्ही अशा देखील काही उपाय योजना करू शकता. त्यावर सर्वात प्रभावी वनस्पती म्हणजे रानतुळस, रानतुळशीला प्रचंड असा उग्र वास असतो, या वासाचा सापांना त्रास होतो, त्यामुळे साप घरात येत नाहीत, तुम्ही या रानतुळशीच्या झाडाला आलेल्या मंजुळा एकत्र करून त्यांना छोट्या-छोट्या कापडामध्ये गुंडळून जिथे-जिथे साप येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी या छोट्या-छोट्या पोटल्या ठेवल्यास याच्या वासामुळे साप घरात प्रवेश करणार नाही, ग्रामीण भागांमध्ये आजही अनेक ठिकाणी साप घरात येऊ नये यासाठी हा उपाय केला जातो.