चाळीस गावांना पाणीटंचाईची झळ
वाडा तालुक्यात ‘जलजीवन मिशन’चा बोजवारा
वाडा, ता. ३ (बातमीदार) ः तालुक्यातील प्रत्येक गाव-पाड्यांत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजना तयार करण्यात आल्या आहेत; मात्र काही योजना अपूर्ण अवस्थेत आहेत, तर काही योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या योजना कागदावरच असल्याने ४० गाव-पाड्यांत भीषण पाणीटंचाईमुळे महिलांचे प्रचंड हाल होत आहेत.
वाडा तालुक्यातील गावदेवी पाडा, वाघात पाडा, निसाळपाडा, पलाटपाडा (पाली), म्हसेपाडा (आमगाव) सुरूमपाडा, धावडपाडा, तुंबडापाडा (पिंपळास), नदीचा पाडा (उमरोठे), कातकरी वाडी, खेत्रीपाडा, गवळीपाडा, खोरीपाडा, वडपाडा (पिंजाळ), सुतकपाडा (मांगरूळ), कातकरी वाडी (मांडवा), निहाळी, खैर पाडा, चिंचपाडा (शेले), धिंडेपाडा, डोंगरीपाडा (सासणे), गावठाण पाडा (वरसाळे), कातकरी वाडी, किन्हईपाडा (लखमापूर), गोठणीपाडा (जामघर), मार्गेपाडा (कोनसई), डोंगरीपाडा (तुसे), दंडाचा पाडा, हेदूचा पाडा (मोज), कातकरी वाडी (बिलावली), फणस पाडा, घोडसाखरे, सागमाळ, जांभूळ पाडा, बोरीचा पाडा, नवले पाडा, भगत पाडा येथे तीव्र टंचाई जाणवत असल्याने येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
-------------------------
वाडा तालुक्यातील ४० गाव-पाड्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
- सूरज दळवी, सचिव, श्रमजीवी संघटना, वाडा