कमी दाब, अपुरा पुरवठा
esakal April 03, 2026 10:45 PM

कमी दाब, अपुरा पुरवठा
दूषित पाण्याच्या तक्रारी वाढल्या; पालिकेची विशेष पथके तैनात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः मुंबईकर उकाड्याने हैराण असताना अपुऱ्या आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचाही त्याला सामना करावा लागत आहे. अलीकडे पाण्याच्या गळतीचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. परिणामी मुंबईकरांना रोगराईचा धोका वाढला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पालिकेची विभागवार पथके तैनात करण्यात आली आहेत. यासंदर्भात गुरुवारी (ता. २) पालिकका मुख्यालयात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणांहून येत आहेत. पालिकेने विनाविलंब योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
रस्त्यांची कामे, उन्हाळ्यात वाढणारी पाण्याची गरज आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जल अभियंता खात्याची एक विशेष आढावा बैठक पार पडली. ही बैठक अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात झाली. या बैठकीला उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, जल अभियंता दिलीप पाटील यांच्यासह जल अभियंता खात्यातील संबंधित वरिष्ठ अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावे, शक्यतो लोकप्रतिनिधींसोबत पाहणी दौरे करावेत, याबाबत सर्व यंत्रणांनी अत्यंत संवेदनशील राहणे गरजेचे आहे, अशाही सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी आढावा बैठकीदरम्यान दिल्या.

अशा आहेत उपाययोजना
पाणीपुरवठ्याच्या ‘झोनिंग’ पद्धतीमध्ये योग्य त्या सुधारणा करणे, एखाद्या जलवाहिनीवर गळती उद्भवल्यास विनाविलंब दुरुस्त करणे, काही ठिकाणी व्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल करणे, आवश्यकतेनुसार अतिरिक्त बूस्टिंग विनाविलंब करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

पथके गठित करा!
दूषित पाण्याचा उगम शोधण्याची कार्यवाही विनाविलंब कोणताही खंड न पडता करावी. ही कार्यवाही करताना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देणेदेखील गरजेचे आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींचा योग्य वेळेत निपटारा करण्यासाठी विशेष पथके गठित करण्यात यावीत. ही पथके परिमंडळनिहाय उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत विनाविलंब कार्यवाही करता येऊ शकेल. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आवश्यक असेल, तर तशी विभागाने मागणी करावी. त्यानुसार मनुष्यबळ प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी सांगितले.

दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने आणि सर्वोच्य प्राधान्याने निपटारा करावा, जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढावी, आवश्यक त्या ठिकाणी पथके तैनात करावीत.
- अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.