बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उतरवल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. अनेक राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी राष्ट्र्वादी आणि महायुतीकडून होत आहे. कॉग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा याकरता राष्ट्रवादी पक्षातून सुनेत्रा पवारांखेरीज इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न झाले नाही. याऊलट,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गाठीभेटी घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येण्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याचे बोलले जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचे म्हटले जात आहे.
राज्यातील राजकारणात एक अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. या फोनवर देवेंद्र फडणवीस यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती फडणवीस यांनी सपकाळ यांच्याकडे केल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना थेट फोन करून अशी विनंती केल्याची ही राज्याच्या राजकारणातील पहिलीच वेळ असू शकते. या फोननंतर काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) नेते शरद पवार यांनीही दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याबाबत शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांशी बोलणी केली. काँग्रेस या प्रस्तावावर सकारात्मक विचार करत असल्याचे शरद पवार यांना सांगण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरद पवारांच्या फोननंतर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.