आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. खरं त हा सामना दिल्लीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला होता. शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 13 धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूत 3 धावा अशी स्थिती आली आणि पाचव्या चेंडूवर डेविड मिलरने फटका मारला. पण धाव घेतली नाही. स्ट्राईक स्वत:कडे ठेवला. पण शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना 1 धाव मिळाली आणि दुसऱ्या धावेवर कुलदीप यादव धावचीत झाला. या पराभवासाठी डेविड मिलरला दोषी धरलं जात आहे. पण आयपीएलमधील एक नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरला आहे. माजी क्रिकेटपटूंनी या नियमावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. पण आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने अद्याव यावर निर्णय घेतलेला नाही. हा नियमच दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात अडसर ठरला. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 10व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नितीश राणाविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील झाली. पंचांनी त्याला बाद घोषित केलं. पण नितीश राणा बाद नव्हता आणि चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला लागला होता. या दरम्यान नितीश राणाने एक धाव घेतली. नितीश राणाने पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागितली. त्यात नाबाद असल्याचं स्पष्ट झाला. पण त्याने घेतलेली एक धाव ग्राह्य घेतली गेली नाही. कारण पंचांच्या निर्णयानंतर चेंडू डेड होतो आणि त्यानंतर घेतलेली धाव ग्राह्य धरली जात नाही. जर ही धाव दिल्ली कॅपिटल्सला मिळाली असती तर चित्र वेगळं असतं. निदान सामना टाय झाला असता.
पराभवाचं विश्लेषण करताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘अर्थातच ज्या प्रकारे आम्ही खेळत आहोत, मला वाटतं दोन्ही संघांनी खूप चांगला क्रिकेट खेळला. आणि हो, मला वाटतं, अशा प्रकारच्या चुरशीच्या सामन्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बोट ठेवू शकता. त्यामुळे मला वाटतं, हो, आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळलो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, चुरशीच्या पाठलागात, चुरशीच्या सामन्यात, तुम्ही अनेक गोष्टींवर बोट ठेवू शकता. पण मला वाटतं की पाठलाग करताना, आम्ही अधिक हुशारीने खेळू शकलो असतो. ज्या महत्त्वाच्या वेळी विकेट्स पडल्या, मला वाटतं जर ते घडलं नसतं, तर आम्ही पाठलाग लवकर पूर्ण करू शकलो असतो.’