आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत सर्वच्या सर्व 10 संघांनी किमान 2 तर जास्तीत जास्त 3 सामने खेळले आहेत. या 19 व्या पर्वात 8 एप्रिलपर्यंत 70 पैकी 14 सामने खेळवण्यात आले आहेत. पावसाने या 14 पैकी एका सामन्याची वाट लावली. तर पावसामुळेच एक सामना संपूर्ण 20 षटकांचा झाला नाही. पावसामुळे सलग 2 सामने प्रभावित झाले. त्यानंतर आता या मोसमातील तिसरा सामनाही पावसाने प्रभावित होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चाहते मोठ्या उत्साहाने पैशांची तडजोड करुन तिकीटाची जुळवाजुळव करुन स्टेडियमपर्यंत पोहचतात. मात्र ऐन वेळेस पावसामुळे सामना रद्द करावा लागतो. त्यामुळे चाहत्यांची निराशा होते.
पावसाने 7 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील 160 मिनिटांचा खेळ वाया घालवला. त्यामुळे उभयसंघात एकूण 20 ऐवजी 11 षटकांचा खेळ झाला. त्याआधी 6 एप्रिलला इडन गार्डन्समध्ये आयोजित कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द करावा. त्यानंतर इडन गार्डन्समधील सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागणार का? अशी स्थिती पाहायला मिळत आहे. दुसरा सामनाही रद्द करावा लागल्यास होम टीम केकेआरच्या अडचणीत वाढ होईल.
स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 15 व्या सामन्यात केकेआर विरुद्ध एलएसजी आमनेसामने असणार आहेत. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे इडन गार्डन्समध्ये करण्यात आलं आहे. केकेआर-लखनौ सामन्यादरम्यान हवामान कसं असेल हे जाणून घेऊयात.
एक्युवेदरनुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता आहे. मात्र संध्याकाळ होताच पावसाची शक्यता कमी होईल. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल मात्र पाऊस होणार नाही. मात्र हा फक्त अंदाज आहे. ऐन वेळेस काय होईल आणि काय नाय हे सांगता येत नाही. त्यामुळे सामना पावसाच्या विघ्नाशिवाय पूर्ण होतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात केकेआरची निराशाजनक सुरुवात झालीय. केकेआरला दोन्ही सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना पावसाने वाया घालवलाय. त्यामुळे आता चौथा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर केकेआर टीमचा प्लेऑफच्या हिशोबाने प्रवास अवघड होईल.