Baramati Bypoll Election News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत. अशातच करुणा शर्मा यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. मी लढणार असल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी मुंबईतला एक नामवंत वकील माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी पाठवला होता असा आरोप शर्मा यांनी केला.
मी बारामती मध्ये उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. माझं म्हणणं एवढंच होतं जर अजित दादांच्या अपघाताचा FIR झाला असता तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता असे करुणा शर्मा म्हणाल्या. जर अजित पवारांचा इतक्या मोठ्या माणसाचा एफ आय आर घेतला नसेल तर माझा अपघात झाला तर कुणाला सांगायचं असे शर्मा म्हणाल्या. म्हणून मी निवडणूक लढत आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने देखील माघार घेतली मात्र मी लढणार आहे. धनंजय मुंडे यांनी मुंबईतला एक नामवंत वकीलाला माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी पाठवले होते. त्याच्यामध्ये मी त्याची प्रॉपर्टी टाकली नसल्याचं सांगितलं. एकीकडे धनंजय मुंडे म्हणतायेत की ही माझी बायको नाही, दुसरीकडे मात्र प्रतिज्ञा पत्रामध्ये तो म्हणतोय की माझी मालमत्ता टाकली नाही. मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मोठ्या तीन लोकांचे फोन आल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली. मी घरघर जाऊन प्रचार करणार आहे. मी पदयात्रा देखील करणार असल्याचे करुणा शर्मा म्हणाल्या.
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आहे. तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे, बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे- शर्मा यांचा अर्ज कायम आहेत. त्यामुळे, बारामती पोटनिवडणुकी एकूण 23 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते, त्यानंतर आज 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे, एकूण, 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.