RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
Tv9 Marathi April 10, 2026 06:45 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शुक्रवारी 2 अजिंक्य संघ भिडणार आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. गतविजेता आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात या मोसमात सलग 2 सामने जिंकले आहेत. तर राजस्थाननेही जबरदस्त सुरुवात करत सलग आणि पहिल्या 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. रियान पराग याच्या कॅप्टन्सीत राजस्थानने ही विजयी हॅट्रिक पूर्ण केली आहे. त्यामुळे शुक्रवारी 10 एप्रिलला राजस्थान आणि बंगळुरुपैकी कोणता संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

ताज्या आकडेवारीनुसार, राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. राजस्थानच्या खात्यात 6 गुण आहेत. तसेच राजस्थानचा नेट रनरेट हा +2.403 असा आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट रनरेट हा राजस्थानपेक्षाही भारी आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा +2.501 इतका आहे. राजस्थान रॉयल्सने 3 आयपीएल विजेत्या संघांना पराभूत केलंय.  राजस्थानने चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या 3 संघांना पराभूत केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगळुरुने सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला आहे.

आरसीबी गेल्या मोसमात राजस्थान विरुद्ध अजिंक्य

बंगळुरु विरुद्ध राजस्थान दोन्ही संघ गेल्या मोसमात (IPL 2025) एकूण 2 वेळा भिडले होते. बंगळुरु गेल्या मोसमातील दोन्ही सामन्यात राजस्थानचा धुव्वा उडवला होता.  बंगळरुने गेल्या हंगामात राजस्थानवर 2 सामन्यांत 9 विकेट्स आणि 11 धावांनी विजय मिळवला होता.    त्यामुळे राजस्थान यंदा बंगळुरुला पराभूत करुन गेल्या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थानसमोर विराटला रोखण्याचं आव्हान

आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पहिल्या दोन्ही सामन्यांत जबरदस्त अशी कामगिरी केलीय. विराटने पहिल्या 2 सामन्यांत 1 अर्धशतकासह एकूण 97 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट राजस्थान विरुद्ध ‘हल्ला बोल’ करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

तसेच बंगळुरुसमोर राजस्थानच्या सलामी जोडीला झटपट आऊट करण्याचा प्रयत्न असणार आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनीही पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात राजस्थानला मुंबई विरुद्ध 11 षटकांच्या सामन्यात 80 धावांची सलामी भागीदारी मिळवून दिली होती. त्यामुळे आरसीबी यशस्वी-वैभवला रोखण्यासाठी काय रणनिती अवलंबते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.