Eknath Shinde | ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते… महाराष्ट्रात काय घडतंय?
Tv9 Marathi April 10, 2026 04:45 PM

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींच्या चर्चांना उधाण आले असून ‘ऑपरेशन टायगर’ आणि खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या दाव्यांवरून वातावरण तापले आहे. मात्र या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तसेच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावी असताना ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रिय झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे गटातील 8 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र या चर्चांना खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळून लावत त्या खोडसाळ आणि खोट्या असल्याचे म्हटले होते.
यानंतर शिंदे गटातूनही प्रतिक्रिया देण्यात आली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले. आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चांवर पडदा टाकत स्पष्ट केले आहे की, अशा कोणत्याही बैठका झालेल्या नाहीत. “उबाठा गटातील खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पसरवणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
या स्पष्टीकरणानंतर ‘ऑपरेशन टायगर’ आणि खासदार फुटीच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.