Supriya Sule : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याचं खापर सुप्रिया सुळे यांनी कोणावर फोडलं?
Tv9 Marathi April 10, 2026 04:45 PM

“आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारात उतरण्या संदर्भात विचारलं, तर विचार करू. शेवटी रिश्ते मायने रखते है..” असं म्हणत बारामतीच्या प्रचारासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवार आहेत. सुनेत्रा पवार यांचं निवडून येणं निश्चित मानलं जात आहे. काँग्रेसने काल आकाश मोरे यांना दिलेली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

खासदारसुप्रिया सुळे आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुनेत्रा पवार बारामतीतून किती मतांनी निवडून येतील? याबाबत विचारणा केल्यावर, “महाराष्ट्रातील बळीराजाला सुख शांती समाधान मिळू दे. आपण इतकचं विठ्ठलाला साकडं घातलं आहे” असं सुळे यांनी सांगितले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निवडून येण्याच्या मताधिक्याबाबत कुठल्याही प्रकारचे ठोस उत्तर देणं सुप्रिया सुळे यांनी टाळल्याचं दिसून येत आहे.

रिश्तेही मायने रखते है

तसेच बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. याबाबत नक्की काय घडले? असं विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न अजित पवार गटाला विचारा असं उत्तर दिलं. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करत निवडणूक बिनविरोध न होण्याचे खापर सुळे यांनी त्यांच्यावर फोडलं. राजकारण होत असतं. सत्ता पैसा येतो जातो. मात्र सुख, दुःखात कुटुंबच आणि माणसंच कामी येतात. त्यामुळे बारामती निवडणुकीत सुनेत्रा वाहिनीच्या मागे… रिश्तेही मायने रखते है… असं म्हणत आपण सोबत असल्याचही सुळे म्हणाल्या.

काँग्रेसचं एक पाऊल मागे

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार दिला होता. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची समजूत काढण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. काल सकाळी रोहित पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना जाऊन भेटले. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली. पार्थ पवार यांच्या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. काँग्रेसचा डाऊन फॉल चाललाय. त्यामुळे त्यांनी उमेदवार दिला असं पार्थ पवार बोलले. अशा वक्तव्याबद्दल त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. अखेर काल अनेकांच्या शिष्टाईला यश आलं आणि काँग्रेसच्या आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. माझी उमेदवारी केंद्रातून देण्यात आली आहे. मी एक योद्धा असून पक्षासाठी लढायला तयार आहे असं आकाश मोरे यांनी म्हटलं होतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.