महिला मूर्ख नाहीत, भाजपला पहिला धक्का बसलाय; प्रियांका गांधींचा हल्लाबोल, म्हणाल्या, केंद्र सरकारसाठी 'काळा दिवस'
esakal April 18, 2026 05:45 PM

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपसह एनडीएतील घटक पक्षांकडून विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस महिला विरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. दिल्लीत पत्रकार परिषद घेत महिला सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारावरून प्रियांका गांधी यांनी भाजपवर घणाघात केला. भाजपला पहिला धक्का बसला असून सध्याची स्थिती सरकारसाठी काळा दिवस असल्याचं त्या म्हणाल्या. Priyanka Gandhi Targets BJP

महिलांच्या समस्या वेगाने वाढतायत आणि त्यांचा संघर्षही मोठा होत चाललाय असं म्हणत प्रियांका गांधी यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. महिला मूर्ख नाही, त्या सगळं बघत आहेत. सरकारला समजलं पाहिजे की त्यांचा पीआर आणि मिडिया हाइप आता मदतीला येणार नाही. तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर २०२३ला सर्वांच्या पाठिंब्यानं मंजूर झालेलं विधेयक पुन्हा आणा अशी मागणी पुन्हा प्रियांका गांधी यांनी केली.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जुनं महिला आरक्षण विधेयक लागू करण्याची मागणी केलीय. इंडिया आघाडातील सर्व पक्षांकडून आता देशात पत्रकार परिषद घेऊन आम्ही महिला आरक्षणाचं समर्थन करतो पण सरकार या विधेयकाच्या आडून देशाच्या राजकारणाचा नकाशा बदलण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगणार आहे.

२०२३चे विधेयक लागू करा

प्रियांका गांधी यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की, सर्व पक्षांनी २०२३च्या विधेयकाला पाठिंबा दिला होता. त्याला लागू करण्यासाठी जनगणनेच्या किंवा मतदारसंघ पुनर्रचनेच्या अटी लावून का लटकवलं जात आहे? सरकारला त्या बिलात काही बदल करायचे असतील तर ते करता येतील. पण महिलांना त्यांचे अधिकार आताच द्या. त्याला इतर गोष्टींशी जोडून दिशाभूल करू नका.

सरकार प्रचारात गुंतलंय

देशातील महिलांची सुरक्षा आणि आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशातील महिला अने अडचणींचा सामना करतायत. सरकार महत्त्वाचे प्रश्न न सोडवता फक्त प्रचारात गुंतले आहे. सरकारसाठी हा मोठा धक्का असू त्यांच्या अहंकाराचा आणि महिलांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे.

सत्तेसाठी घटनादुरुस्तीचा घाट

मतदारसंघ पुनर्रचना करण्याआधी जातीय जनगणना व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. मतदारसंघ पुनर्रचना समितीत त्यांचेच लोक आहेत. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी ही घटनादुरुस्ती आणण्याचा प्रयत्न केला.. कोण विश्वास ठेवेल, जनता विश्वास ठेवत नाहीय असंही प्रियांका गांधींनी म्हटलं.

पुनर्रचनेत प्रमाण कायम ठेवा

१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी उत्तर-दक्षिण विभागणी होऊ नये यासाठी निर्णय घेतला, अटलजींनीही असाच निर्णय घेतला. पण तुम्ही गुणोत्तर बदलण्याचा प्रयत्न करताय. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. दक्षिणेकडील राज्यात संख्या कमी केली तर देशात संकट निर्माण होईल. जसं आहे तसंच गुणोत्तर रहावं अशी मागणीही प्रियांका गांधींनी केली.

काँग्रेसचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिलांसाठी प्रयत्न

२०२३ च्या विधेयकात सध्या जितक्या जागा आहेत त्याच जागांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणार असं होतं. त्यासाठी आम्ही तयार आहोत. काँग्रेसने १९२८मध्ये महिलांसाठी प्रयत्न सुरू केले. काँग्रेसमुळे स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून भारतात महिलांना मत देण्याचा अधिकार मिळाला. आता आम्ही सगळीकडे हेच सांगू की २०२३ विधेयक आणा, त्यानुसार जे बदल करायचे ते करा आम्ही त्याला पाठिंबा देऊ असंही प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.